स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले- अजय चितळे
भाजपा मध्य मंडलच्यावतीने अभिवादन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वाचे नाव भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे. ‘राष्ट्र’ हेच त्यांचे जीवनमुल्य होते. मी समुद्रात टाकलेली उडी विसरलो तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरु नये, या त्यांच्या वाक्यातून समाजसुधारणांना किती महत्व देत होते हे समजून येते. त्यांचा सामाजिक विचारांचा हिंदूत्व हा गाभा होता. त्यांनी आधुनिक विश्वसंस्कृतीस हिंदूत्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार आणि सांगितलेले तत्वज्ञान हे आजही आपणासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्र हा केंद्रबिंदू मानून प्रत्येकाने कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपा मध्य मंडलच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष अजय चितळे, उपमहापौर मालनताई ढोणे, मयुर बोचूघोळ, संजय ढोणे, प्रशांत मुथा, अविनाश परळकर, विलास भोपळे, नाना देवतरसे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य, त्यांचे विचार हे नेहमीच सर्वांसाठी मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांनी आपले सर्व जीवन देशासाठी समर्पित केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांकडून झालेल्या शिक्षा आणि भोगलेल्या हालअपेष्टा या कोणीही विसरु शकत नाही. त्यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी राहील, असे सांगितले.
No comments:
Post a Comment