कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही प्रविण दरेकरांचा प्रशासनाला इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही प्रविण दरेकरांचा प्रशासनाला इशारा

 कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही प्रविण दरेकरांचा प्रशासनाला इशारा



नगरी दवंडी

बीड, ५ मे - बीड शहरात करोना प्रतिबंधक उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांमध्ये ताळमेळ असणं आवश्यक आहे. परंतु, बीड जिल्ह्यात त्याचा अभाव असल्याचं लक्षात येतं.  या जिल्ह्यातील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण गंभीर असून त्यावर नियंत्रण मिळवावेच लागेल. या लढाईत जराही कुचराई चालणार नाही.  सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, अशा सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बीडमधील नागरिकांच्या सहकार्याने करोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

दरेकर आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते २०० बेडस जिजाऊ कोविड सेंटरचं, श्री दत्त कोविड सेंटरचं व नायगयाव येथील कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच आई साहेब कोविड सेंटर येथे भेट घेत त्यानंतर त्यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात जिल्हाधिकारी व कलेक्टर यांची भेट घेतली व चर्चा केली.

बीड जिल्ह्यासाठी वैद्यकीय सामग्री, औषधे व निधीचीही कमतरता पडत असल्याचे दिसून येत आहे.   २००० रेमडेसेवीरची गरज असताना २०० ते ४०० रेमडेसेवीर बीडसाठी मिळत असल्याची तक्रारही दरेकर यांनी केली.  पुरेसा ऑक्सीजन असल्याचे सरकार म्हणत असले तरी बीडमधील २ कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन साठा नसल्याची व त्यांनी मागणी करूनही त्यांना ऑक्सिजन मिळत नसल्याची माहिती मिळाल्यावर मी येथूनच अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व बीडसाठी ऑक्सीजन साठा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांना केली, अशीही माहिती दरेकर यांनी माध्यमांना दिली.

करोना काळात झालेल्या गैरव्यवहारावर बोट ठेवताना दरेकर म्हणाले, कोरोना आपत्तीच्या काळात काही आरोग्य सेवकांनी देवदूत म्हणून काम केलं तर काही अधिकाऱ्यांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्यात धन्यता मानली. यावेळी दरेकर यांनी बीड जिल्ह्यात मागील काळात घडलेल्या काही घटनांचाही उल्लेख केला. एकाच रुग्णवाहिकेतून २२ प्रेत नेण्याचा प्रकार, कोविड सेंटरमधून रुग्ण मास्क न घालता खरेदीसाठी बाहेर पडल्याचा प्रकार, रेमडीसीविरचा काळाबाजार, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा झालेला मृत्यू, या घटनांचा उल्लेख करून या घटनांना कोण जबाबदार आहेत ? असा सवलाही दरेकर यांनी उपस्थित  केला.

या सर्व काळात प्रशासनाचा भोंबळ कारभार उघड्यावर आला असून पालकमंत्र्यांनी ठाण मांडून व्यवस्थेमधील गोंधळ दूर करण्यासाठी व वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता होती. परंतु असे झाले नाही. राज्यसरकार, मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार असून आवश्यक असेल तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे केंद्राशी बोलून बीड मधील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू असेही दरेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment