पवार - फडणवीसांच्या भेटी मागचे राजकारण (भाग -२) - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

पवार - फडणवीसांच्या भेटी मागचे राजकारण (भाग -२)

 पवार - फडणवीसांच्या भेटी मागचे राजकारण (भाग -२)



नगरी दवंडी

यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहे त्याच्यामागचे कारण हे ही तितकच महत्त्वाचं आहे. गेल्या महिन्याभरात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये यादवी माजल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर आवाज चढवून बोलल्याचे किसे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण शमवण्यासाठी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी थेट मातोश्रीवर धाव घेतली होती. परंतु तेथील वाटाघाटींमध्ये उद्धव ठाकरे यांची नाराजी समोर आली होती. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की महाविकास आघाडी सरकार टिकवणे एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही त्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. कारण ज्यावेळी शरद पवार आणि भाजपच्या नेत्यांच्या सदिच्छा भेटी किंवा राजकीय गुप्त भेटी होतात त्यावेळी शिवसेनेला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे परंतु शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जरी ही वरवर सदिच्छा भेट वाटत असली तरी आतमध्ये काहीतरी शिजलं आहे ते समजायला जनता दुधखुळी नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता वाढू लागली आहे. अस्वस्थताही तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द ठरविण्यात आल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेला इशारा दिला होता. वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडू असा तो इशारा होता . नाना पटोले यांनी म्हटले होते की सत्ता हे काँग्रेसचे अंतिम ध्येय नाही त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता लपून राहिलेली नाही . महाविकास आघाडीमुळे काँग्रेसला मोठं नुसकान होणार असल्याचं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्षात आलं असून वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसला फटका बसला आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेमध्ये किती काळ राहणार हे कोणीही सांगू शकत नाही. काँग्रेसच्या कार्यपद्धती प्रमाणे आदेश आल्यानंतर काँग्रेस सरकार बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते परंतु राष्ट्रवादीचे गणित वेगळं आहे .   राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा फिफ्टी-फिफ्टी चा फॉर्म्युला  ठरला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवं आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील अनेक नेत्यांना मंत्रीपदी बसवलं. अनेक सहकार सम्राटांना नामदार बनवलं.  अनेक आमदारांना कॅबिनेट मंत्री केलं . राज्यमंत्री केलं परंतु स्वतःच्या कन्या सुप्रिया सुळे यांना ते मुख्यमंत्री करू शकले नाही याची खंत शरद पवार यांना वेळोवेळी मनात खात असते. त्यामुळे शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं असल्यामुळे शिवसेनेवर एक दबावतंत्राचा वापर शरद पवार करत आहेत. परंतु हे दबावतंत्राचा हुकमी एक्का चालला नाहीतर शरद पवार सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तात्काळ घेऊ शकतात त्यानंतर भाजपा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करेल असे सध्या तरी वाटत नाही कारण भाजपला ओसाड गावची पाटिलकी नको आहे त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या राज्याचे नेतृत्व करणे भाजप नेत्यांना सध्या जास्त चांगले आणि हिताचे वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात हे सरकार पडल्यानंतर थेट निवडणुका होऊ शकतात यामध्ये तीन पक्षांमध्ये एकमेकांची खेचत स्पर्धा असल्यामुळे याचं मोठं नुसकान शिवसेनेला होणार आहे . त्यामुळे नुकत्याच देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीवर चर्चा होणे स्वाभाविकच आहे . त्या एक तास झालेल्या भेटीमध्ये नेमकं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा झाली ही प्रश्न अनुत्तरीत असले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी झालेली भेट ही फक्त एक सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि शरद पवार यांनीही ही प्रतिक्रिया दिली तरीसुद्धा या भेटीमध्ये काय शिजलं याची उत्सुकता माध्यमांना आणि राज्यातील जनतेला लागून राहिली आहे ही भेट गुप्त नसली उघड असली तरी या भेटीतील मुद्दे मात्र गुप्तच आहेत ते लवकरच पुढे आल्यानंतर महा विकास आघाडीचे भवितव्य ठरेल.


लेखक- दत्ता पवार (मो- ९६५७६०८३३२)

No comments:

Post a Comment