स्व. राजीव गांधींमुळे देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

स्व. राजीव गांधींमुळे देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली

 स्व. राजीव गांधींमुळे देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली

किरण काळे ः काँग्रेसच्या वतीने स्मृतिदिनानिमित्त स्व.गांधी यांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्यामुळे भारतामध्ये तंत्रज्ञानाची क्रांती झाली. स्व. गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम झाले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, क्रीडा काँग्रेस शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, राजीव गांधी यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टीतून विविध क्षेत्रांमधील विकासाची मुहूर्तमेढ रोवत पाया भक्कम केला. आजचा भारत हा त्याच पायवर भक्कमपणे विस्तार करत आहे. राजीव गांधी यांच्या कालावधीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचे काम करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरण हाती घेत शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय पातळीवर सुधारणा करण्यात आल्या.
काळे पुढे म्हणाले की, गांधी यांच्या कार्यकाळात विशेषतः उद्योग क्षेत्राला चालना मिळण्याच्या दृष्टीने तसेच देशामध्ये युवकांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले. त्यांच्यासाठी विशेष पॅकेजेस तयार करण्यात आली. त्याच बरोबर त्यांना विविध प्रकारच्या सूट देत प्रोत्साहन देण्यात आले. राजीव गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशाची केलेली सेवा ही अतुलनीय आहे. गांधी हे आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान राहिले असून वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांना या पदावर काम करत देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गौरवाची बाब आहे, अशी भावना यावेळी काळे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment