अखिल भारतीय किसान उद्या सभा, मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काळा दिवस पाळणार
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनताविरोधी धोरणांचा निषेध म्हणून उद्या देशभर ’काळा दिवस’ पाळणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेने सांगितले आहे. तसेच 24 ते 30 मे विविध उपक्रम राबवणार असल्याचेही म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच ऑनलाईन घेण्यात आली. 26 जिल्हयातील 45 प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
येत्या 26 मे रोजी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता सहा महिने होत आहेत. तर कामगारांच्या आंदोलनला सुध्दा सहा महिने पूर्ण होत आहेत. मोदी सरकारने गत सात वर्षांत शेतकरी, शेतमजूर, कामगारांना मोदी सरकारने देशोधडीला लावले आहे. शेतकरीविरोधी तीन कायदे परत घ्यावेत. शेतीमालाला किमान हमी भाव देण्याचा कायदा करावा, यासाठी संपूर्ण देशव्यापी आंदोलनाला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. खतांच्या किमती वाढवून पुन्हा कॉर्पोरेट कंपन्यांना 14 हजार कोटी रुपये अनुदान दिले. आता या खेळीत पुन्हा खतांच्या किमती पूर्ववत करून शेतकर्यांना आम्ही दिलासा दिल्याचे नाटकही वटवले आहे. कोरोनाची महामारी या देशात आणण्यासाठी मोदींची बेजबाबदार धोरणे कारणीभूत आहेत. पोकळ घोषणा करायच्या आणि त्यांची अंमलबजावणी शून्य हे मोदींचे कर्तुत्व या देशातील लाखोंच्या जीवावर उठले आहे. राजकारण तर आपण पाहत आहोत आतापर्यंत 45 वर्षावरील निम्म्या लोकसंख्येला ही लस मिळू शकली नाही. कोणतेही नियोजन न करता थाळ्या व टाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम मोदी सरकारने आत्तापर्यंत घेतले आहेत.
मोदींच्या जनताविरोधी धोरणांना संपूर्ण देशभर विरोध होत आहे. शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक आता मोदींविरोधी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्यास सज्ज आहे. म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक संघटना 26 मे रोजी आपल्या घरावर काळे झेंडे लावून 24 मे ते 30 मे 2021 या कालावधीत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सुभाष लांडे होते. कॉम्रेड नामदेव गावडे, कॉ.राजन क्षीरसागर, कॉ.बन्सी सातपुते, कॉ.हिरालाल परदेशी, कॉ.डॉ.महेश कोपुलवार, कॉ.नामदेव चव्हाण, कॉ.अशोक जाधव यांनी बैठकीत आपली मते मांडली.
No comments:
Post a Comment