जिल्हा जिंकतो.... तेव्हा देश जिंकतो- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः एखादा जिल्हा जिंकतो तेव्हाच देश जिंकतो. आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत, तेथे विविध आव्हाने देखील आहेत. आपल्या जिल्ह्यातील आव्हाने तुम्हाला चांगलीच समजली आहेत. तुमच्या जिल्ह्याने करोनावर मात केली तर तो देशाचा विजय असेल. असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिकार्यांना दिला.
करोनाने देशात थैमान घातले. शहरानंतर करोनाने ग्रामीण भागात देखील पाय पसरायला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) करोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. त्यांनी बैठकीत जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लसीची प्रक्रिया वाढविण्याबाबत चर्चा केली.
मोदी यांनी जिल्हाधिकार्यांना करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगितले. जर जिल्ह्यांमध्ये करोना नियंत्रणात आला तर देशात आपोआप करोना नियंत्रणात येणार असल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी जिल्हाधिकार्यांना ’फील्ड कमांडर’ म्हणून संबोधले. या बैठकीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सहभाग घेतला होता. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, माझ्यापासून तुम्हाला पूर्ण सूट आहे. आपल्याकडे संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरू शकणार्या काही सूचना असल्यास मला न डगमगता सांगा. कोविड व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या ’इज ऑफ लिव्हिंग’ ची काळजी घ्यावी लागेल. आपल्याला संसर्ग देखील रोखायचा आहे आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील विनाव्यत्यय ठेवायचा आहे.
No comments:
Post a Comment