400 कलाकारांना किराणा सामान देऊन मदत : प्रतिभा धूत
धूत चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दुसर्यांदा झालेल्या लॉकडाऊन मुळे कलेचे उपासक सर्व कलाकार अडचणीत आहेत. यासाठी सेठ माधवलाल धूत व श्री.रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्या वतीने सामाजिक दायित्व जपत प्रसिद्ध कलाकार पवन नाईक यांच्या प्रयत्नातून अन्नपूर्णा योजने अंतर्गत आर्थिक अडचणीतील सुमारे चारशे कलाकारांना किराणा मालाचे कीट देवून छोटीशी मदत केली आहे, अशी माहिती संस्थेच्या जेष्ठ सदस्या प्रतिभा धूत यांनी दिली.
नगरच्या सेठ माधवलाल धूत व श्री.रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही सामजिक ट्रस्टच्या विश्वस्तांच्या वतीने जीवन कला प्रकल्प म्हणून जिल्ह्यातील कलाकारांसाठी अन्नपूर्णा योजना राबवून चारशे कलाकारांना किराणा मालाचे कीट देण्याचा शुभारंभ ट्रस्टी श्रीगोपाल धूत व प्रतिभा धूत यांच्या हस्ते झाला. या उपक्रमासाठी दोन्ही ट्रस्टचे विश्वस्त किशोरीलाल धूत (औरंगाबाद), श्रीगोपाल धूत (अहमदनगर), राधावल्लभ धूत (औरंगाबाद) व रमेश धूत (औरंगाबाद) या चार भावंडांच्या वतीने सुमारे चार लाख रुपयांची आर्थिक मदत कर्तव्याच्या भावनेने केली. यावेळी योजनेचे समन्वयक पवन नाईक उपस्थित होते.
श्रीगोपाल धूत म्हणाले, गेल्या चौदा महिन्यांपासून असलेल्या कोरोना काळात कलाकारांची फार मोठी वित्तीय हानी झाली. मनोरंजन व आत्मरंजन क्षेत्राशी निगडित शास्त्रीय, सुगम, ऑर्केस्ट्रा, नाट्य, दूरचित्रावणी मालिका, निवेदन व ध्वनी व्यवस्थापन क्षेत्रातील कलाकार आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना कर्तव्याच्या भावनेतून परिवाराच्या गरजेनुसार एक ते तीन महिने पुरेल असे गहू, तांदूळ, डाळ व तेल असलेले धान्याचे कीट दिले आहे. प्रास्ताविकात पवन नाईक म्हणाले, शहरातील सेठ माधवलाल धूत चॅरिटेबल ट्रस्टचे वारकरी, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य सर्वश्रुत आहे. श्री.रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नगरच्या संगीत क्षेत्राला पाठबळ देत महाराष्ट्र संगीत भूषण या राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन केले जाते. आता संकट काळात जिल्ह्यतील कलाकारांना मदतीचा हात देत मोठे सहकार्य केले आहे. यासाठी नादब्रह्म संगीतालय संस्थेने पुढाकार घेत समिती नेमून जिल्ह्यतील गरजू कलाकरांचा शोध घेतला. यासाठी राजू साळवे, शेखर दरवडे, रवी जाधव, गोपीनाथ वर्पे, संतोष कुलट, आदेश चव्हाण, श्रेयस शित्रे, पंकज नाईक, मदन आढाव यांनी मदत केली. ट्रस्टचे हितचिंतक सुरुची मोहता(मुंबई), अंकुश जाधव, सागर जाधव, गौरव काते, सोमा घोरपडे, अविनाश तिजोरे, डॉ. वैभव भुईटे, संदीप कोरडे, अभिजित हिंगे व बाबा मुकिंदे यांनी योजना पूर्तीसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment