आमदार रोहित पवार ठरले ‘पॉवरफुल’ श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी, आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी 399.33 कोटी निधी मंजूर
नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असणारा आणि नुकताच नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग 548 (ड) मधील आढळगाव ते जामखेड या 62.77 किमी. दोन लेनच्या चौपदरीकरणाच्या कामाकरिता 399.33 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. विकासकामांचा धडाका सुरु ठेवणारे राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रोहित पवार पुन्हा एकदा मतदारसंघासाठी पॉवरफुल” ठरले आहेत.
सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असणा-या आ. रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील इतर प्रश्नांसोबतच दळणवळणाच्या समस्या सोडवण्यास कायम प्राधान्य दिले आहे. जनसामान्यांसाठी व एकंदरीतच सर्वच क्षेत्रांसाठी महत्वाचा घटक असणा-या रस्त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता आ. रोहित पवार कायम पाठपुरावा करत असतात. त्यांच्या अशाच रस्ते संदर्भातील पाठपुराव्याला यश आले आहे. न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून या मार्गातील आढळगाव ते जामखेड या 62.77 किमी. मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी 399.33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघाचे भाग्य उजळले आहे. प्रवासी वाहतूकीसह कारखानदारी वाहतूकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर नगर-सोलापूर 516 (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे. नगर सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. तालुक्यातील या रस्त्यांच्या प्रश्नासाठी आ. रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोनदा भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच संबंधित अधिका-यांसोबत एकदा बैठक घेऊन संबंधित कामाचा पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयात आर्वजून लक्ष घातले होते. अखेर या पाठपुराव्याला यश आल्याने मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 18 महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पुर्ण होणार असून रस्ता झाल्यापासून 10 वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल, असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.
तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा तालुक्याच्या विकासासाठी एक महत्वाचा घटक आहे. नगर- सोलापूर व आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामांसाठी मी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. जनेतच्या मागणीचा मान राखत त्यांनी भरीव निधी मंजूर केला. याबाबत माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार. या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल.
No comments:
Post a Comment