‘विकेंड लॉकडाऊन’ सक्सेस् !
कोरोनाच्या धसक्यामुळे नागरिक घरातच.. प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट...
रस्त्यावरील वाहनांची वर्दळ थांबली ठिकठिकाणी बॅरीकेटींग. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य.
लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी बस स्थानकावर ही शुकशुकाट. शिव भोजन थाळीसाठी नागरिकांच्या रांगा.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व भाजपाचा विरोध असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘विकेंड लॉकडाउन’ चा निर्णय घेतला. नगरकरांनी या निर्णयाला आज उस्फुर्त प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले. नागरिकांनी आज स्वतः होवून घरातच राहणे पसंद केले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. वाहनांची वर्दळ थांबली पोलीस प्रशासनाने चौका-चौकात बॅरीकेटिंग लावली. पण पोलीस प्रशासनाला फार मोठे कष्ट पडले नाहीत. चितळे रोड, माळीवाडा, कापड बाजार, सर्जेपुरा, सावेडी, पाईपलाईन, गुलमोहर, नगर-कल्याण, नगर-पुणे, नगर-मनमाड सर्वच रस्त्यांवर मेडिकल, दूधडेअरी, बेकरी, दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे नागरिकांनी घराबाहेर पडू नका हे केलेले आवाहन नागरिकांनी आज पाळले असून उद्याही नागरिक लॉकडाउनला चांगला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन म्हणजे काय असतो याचा अनुभव आज नगरकरांनी घेतला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद आहेत. तर किराणा माल , भाजीमार्केट , हॉटेल्सनाही टाळे लागले आहे. वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी पेट्रोल पंप, मेडिकल आणि दुधाची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. अगदी साधी टपरीदेखील उघडी नाही. राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकाने कडक निर्बंध लावताना शनिवार आणि रविवारी कडक लॉकडावून घोषित केला. या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहीर करण्यात आले.
चौकाचौकात रिक्षावाले प्रवाशांची वाट पाहत उभे होते, पण रिक्षात बसण्यासाठी प्रवासी नव्हते. “शिवभोजन थाळी” घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर गर्दी दिसत नसली तरी लसीकरण केंद्रावर मात्र लस टोचून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील तीनही बसस्थानकांवर शुकशुकाट होता. आज नागरिक प्रवासासाठी बाहेर पडणार नाहीत ही शक्यता गृहित धरून एसटी प्रशासनानेही बसेस आगारातून बाहेर काढल्या नाहीत. मनपा पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी मात्र शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. घनकचरा विभागाचे कर्मचारी ही साफसफाई करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत होते.
राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाउनला विरोध होत असताना नगरकरांनी विकेंड लॉकडाउन मात्र मनापासून स्वीकारलेला दिसत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर चिटपाखरूदेखील दिसत नाही. नेहमीची वर्दळीची गजबजणारी ठिकाणे शांत शांत आहेत. हॉटेल्स , बार यांना पार्सल सेवा देण्यास मुभा असली तरी तीदेखील बंद असल्याचे पहायला मिळाले. अगदी किराणा मालाच्या दुकानांचेही शटर डावून असून भाजीमंडई, बस स्थानकावर शुकशुकाट दिसून आला. आजच्या लॉकडाउनमुळे प्रवासी आणि अन्य वाहतूक देखील कोलमडली आहे. अधून मधून जाणारे एखादे वाहन वगळता वाहतूकदेखील थांबलेली आहे . नगर-पुणे महामार्ग आणि नगर-मनमाड महामार्गावर अगदी तुरळक वाहने पहायला मिळत आहेत. एसटीची सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी प्रवाशांअभावी बसेस आगारातच उभ्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या अन्य जिल्हयातून काल आलेल्या बसेस परत जाताना रस्त्यावर दिसून आल्या. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असला तरी पोलिसांना फारसे काही काम उरलेले दिसत नाही. येणार्या जाणार्या वाहनचालकांची चौकशी करूनच त्यांना पुढे सोडण्यात आले. लॉकडाउनमुळे लोकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. तर अनेकांनी पोलीस कारवाईच्या भीतीमुळे घरातच राहणे पसंत केले. सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने रस्त्यावर वर्दळ अजिबात दिसून आली नाही.
No comments:
Post a Comment