डॉ. पांडुरंग सानप यांचा भास्कर भोरेंसह अनोखा सायकल प्रवास
नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः माणसामध्ये प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द असेल तर अशक्य काहीच नसते असे म्हणतात, हेच वाक्य पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील पेशाने डॉक्टर असलेल्या पांडूरंग सानप यांनी खरे करुन दाखवले आहे. त्यांनी आपल्या वयाच्या 49 व्या वर्षी प्रदुषणमुक्त भारत व इंधन बचावचा नारा देत कश्मीर ते कन्याकुमारी असा तब्बल 4 हजार कि.मी.चा प्रवास पुर्ण केला आहे.
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रहीवासी असलेले डॉक्टर पांडूरंग सानप हे वैद्यकिय व्यवसायाच्या निमीत्ताने जवळच असलेल्या जामखेड येथे राहतात. काही वर्षांपुर्वी त्यांनी व्यायामाच्या आवडीतून धावण्याचा सराव सुरु केला. सुरुवातीला केवळ व्यायामाच्या उद्देशातुन सुरु केलेल्या धावण्याच्या सरावाला त्यांनी हळूहळू वाढवत थेट 10 ते 20 कि मी पर्यंत नेले. त्यानंतर मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी थेट मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक मॅरेथॉन पुर्ण केल्या. या दरम्यान त्यांना सायकलींगचा छंद लागला व त्यामध्येही त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. डॉ.पांडूरंग सानप हे गत वर्षी कोरोनाबाधित झाले होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने फिटनेससाठी सायकलींग व व्यायाम सुरु केला. त्यानंतर त्यांच्या मनात सायकलवरुन भारत भ्रमण करण्याची संकल्पना आली. त्यांनी त्या दृष्टीने सर्व तयारी केली. सध्या कोरोना संकट असल्यामुळे हे सर्व आव्हानात्मक होते. मात्र, त्यांनी ठाम निर्धार केला व कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास ठरवला, त्यांच्या साथीला जामखेड येथील भास्कर भोरे हे देखील होते. 18 मार्चला सकाळी 6 वाजता डॉ. सानप यांनी कश्मीरच्या श्रीनगर येथील लाल चौकातुन आपला सायकल प्रवास सुरु केला. दररोज 200 किमी प्रवासाचे ध्येय ठेवत त्यांनी जम्मु, पंजाब, हरीयाणा, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, अशी दहा राज्ये पार केली. या प्रवासादरम्यान त्यांना विचित्र हवामानाचा सामना करावा लागला. कश्मीरमध्ये बर्फ तर राजस्थानात अंगाची लाही करणारे कडक उन्ह अशा हवामानाचा सामना करत डॉ. पांडूरंग सानप 3 एप्रिलला सकाळी 6 वाजता कन्याकुमारीत पोहोचले, यावेळी त्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन आनंदोत्सव साजरा केला.डॉ. पांडूरंग सानप यांनी आत्तापर्यत अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत त्या यशस्वी पुर्ण केल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद, नगर, सातारा येथील 21 कि. मीच्या हाफ मॅरेथॉन तर शिर्डी येथील तब्बल 42 कि मीची फुल मॅरेथॉन त्यांनी यशस्वी पुर्ण केली. लडाख येथे 11 हजार फुट उंचीवर ऑक्सिजनची कमी असताना देखील 21 कि मीची मॅरेथॉन न थांबता त्यांनी पूर्ण केली होती. मुंबई झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन 42 कि मीची मॅरेथॉन यशस्वीरित्या पुर्ण केली होती. माथेरान या ठिकाणी पार पडलेली 50 कि मीची अल्ट्रा मॅरेथॉन 6 तास 30 मिनीटांची वेळ काढत पूर्ण केली आहे. माणसामध्ये प्रबळ इच्छाशक्ति असेल तर माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे डॉ. पांडूरंग सानप सांगतात.
No comments:
Post a Comment