हभप सुभाष सुर्यवंशी सामान्य परिवारातील असामान्य व्यक्ती ः भुजबळ
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः हभप सुभाष महाराज सुर्यवंशी सामान्य परिवारातील असामान्य व्यक्ती होते. त्यांचे विचार आणि विठ्ठलभक्ती त्यांनी अनेक प्रवचन, किर्तनातून स्पष्ट केली. ‘झी टिव्ही’च्या माध्यमातून त्यांचे किर्तन राज्याच्या कानाकोपर्यात गेले पण महाराजांच्या वागणुकीत किचिंतही बदल झाला नाही, असा विठ्ठलभक्त आपल्यातून वैकुंठवासी झाला तरीही त्यांच्या स्मृती, त्याचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केले.
अहमदनगर शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ आणि पदाधिकारी यांनी सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. पक्षाचे प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, महिलाध्यक्षा सौ.सविता मोरे, मार्गारेट जाधव, निजाम पठाण, राजेश बाठिया, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, सौ.किरण आळकुटे आदि यावेळी उपस्थित होते. शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवी सुर्यवंशी यांचे हभप सुभाष महाराज हे ज्येष्ठ बंधू होते.
प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर म्हणाले, महाराज राजकारणा पलिकडे समाजकारणावर चर्चा करीत. त्यांना समाजकारण अभिप्रेत होते. ते म्हणत निवडणूक वगळता इतर सर्व काळ समाजाच्या हिताचे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचा आग्रह धरावा, प्रश्न सुटेल न सुटेल पण प्रश्न मांडणारे हे खरे कार्यकर्ते म्हणून नावारुपाला येतील.
यावेळी अनेक वक्त्यांनी महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळ दिला. शेवटी शहर चिटणीस मुकुंद लखापती यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment