कल्याणरोड परिसरातील पाण्याचा प्रश्न नसुटल्यास 8 एप्रिलला महापालिकेत जागरण गोंधळ, बोंबाबोंब आंदोलन!
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असताना मनपा प्रशासनाला आज तागायत जाग आली नाही. गेली 15-20 वर्षांपासून या परिसरातील महिला, नागरिक पाण्यासाठी आक्रोश करीत आहेत. सध्या नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या असताना कल्याण रोड परिसरातील नागरिकांना कोरोनाची भीती वाटत नाही.परंतु पाणी प्रश्नांची भीती वाटू लागली आहे. आज पाणी मिळेल, उद्या तरी पाणी मिळेल या आशेवर महिला नगरसेवकांच्या घरी येरझर्या घालीत आहेत. सकाळी उठल्यावर एकच प्रश्न समोर उभा राहतो.. तो पाण्याचा... मुळा धरणात पाण्याचा मुबलक पाणी साठा असताना हा पाण्याचा वनवास कल्याण रोड परिसरातील नागरिकांनाच का? आत्तापर्यंत खूप सहन केले, आता नाही? झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी 8 एप्रिल रोजी महानगरपालिकेत जागरण गोंधळ व बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक शाम नळकांडे यांनी दिला आहे.
कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्नासाठी बोलताना नळकांडे म्हणाले की, स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. मुळा डॅम मध्ये जाऊन पाणी साठ्याची माहिती घेतल्यानंतर डॅम मध्ये पाणी मुबलक असून शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असे स्पष्ट केल्यानंतर ही नगर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होतो पण कल्याण रोड परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठीचा वनवास अजुन संपत नाही. हा दुजाभाव का करण्यात येतोय हा या परिसरातील नागरिकांचा मनपा प्रशासनाला सवाल आहे. नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल होत असल्यामुळे नागरिक कायम या त्रासाने त्रस्त झालेला आहे. या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. गेली 15-20 वर्षापासून पाणीप्रश्नासाठी विविध आंदोलन, मोर्चे, उपोषणे तसेच नागरिकही वेळोवेळी रस्त्यावर आले आहे. परंतु झोपलेल्या महापालिका प्रशासनाला आजतागायत जाग आलेली नाही. मुळा धरणात पाणी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. 10 ते 12 दिवसांनी होणार्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हतबल झाला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेमध्ये 8 एप्रिल रोजी जागरण गोंधळ व बोंबाबोंब आंदोलन करणार असून या परिसरातील पाणी प्रश्न न सुटल्यास न भूतो न भविष्यती. असे मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही नळकांडे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment