नेहरू मार्केटमधील अस्तित्वास नसणार्या गाळ्यांना मालमत्ता कराच्या नोटिसा
नेहरू मार्केटचे भाग्य कधी उजळणार शुभम झिंजे यांचा सवाल
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील चितळेरोडवर नेहरू मार्केट ही अत्यन्त देखणी वास्तू होती यामध्ये भाजी विक्रेते बसत तर काही गाळे होते, गेला अकरा वर्षांपूर्वी हि वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. तत्कालीन आयुक्त यांनी ही वास्तू पाडताना गाळेधारकांना शब्द दिला होता की एक वर्षांमध्ये नवीन वास्तू बांधून मिळेल व जे गाळेधारक आहेत त्यांना प्राधान्याने गाळे देण्यात येतील पण सध्या ही जागा मोकळी पडलेली आहे तेथे गाळे अस्तित्वात नाही तरी महानगरपालिकेने घरपट्टी भरावी म्हणून नोटीस पाठवली आहे ती रद्द करावी अशी मागणी चितळेरोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटना अध्यक्ष शुभम झिंजे, तसेच नेहरू मार्केट कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर श्री पुरोहित,बाळासाहेब तरोटे, सतीश तरोटे, विजय चौधरी आदी गाळेधारकांच्या सह्या आहेत.
शुभम झिंजे यावेळी म्हणाले अनेक वेळा आंदोलने झाली टेंडर निघाले शेवटी महापालिकाच भाजीमार्केट व व्यावसायिक संकुल बांधण्याचा निर्णय दोन वर्षपूर्वी घेण्यात आला पण यावर कार्यवाही होऊन कधी गाळे मिळणार व गाळे नसतानाही मनपा किती वर्षे घरपट्टीचे बिले पाठविणार असा सवाल त्यांनी केला आहे. चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या मागील 11 वर्षांपासून मोकळ्या पडून असलेल्या मोक्याच्या जागेचा विकास मार्गी लागण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. खासगीकरणातून येथे भाजी मार्केट व व्यावसायिक संकुल उभारण्यास विरोध असल्याने अखेर महापालिकेद्वारेच हे काम करण्याची तयारी महापौर यांनी 2 वर्षपूर्वी सुरू केली आहे.त्यावेळी त्यांनी या मोकळ्या जागेची पाहणी केल्यानंतर नगररचना व बांधकाम विभागाला भाजी मार्केट व व्यावसायिक संकुलाचा बांधकाम आराखडा व अंदाजपत्रक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.पण प्रशासन यावर पुढे काही हालचाल करताना दिसत नाही
नगरचे विकास पुरुष मानले जात असलेले ज्येष्ठ नेते (स्व.) नवनीतभाई बार्शीकर नगराध्यक्ष असल्याच्या काळात चितळे रस्त्यावर नेहरू मार्केट उभारण्यात आले होते. ते जुने झाल्याने तेथे नवे मार्केट उभारण्यासाठी 2008मध्ये पाडण्यात आले. मात्र, त्यानंतर आजतागायत त्याची पुन्हा उभारणी झाली नाही. या दरम्यान मनपावर राष्ट्रवादी व शिवसेनेची व आत्ता भाजपची सत्ता आहे .जिल्हा वार्षिक विकास नियोजनांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून या मार्केटसाठी निधी उपलब्धतेचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यात अपयश आल्याने मग खासगीकरणातून बीओटी तत्वावर उभारणीचा विचार झाला. पण यासाठीच्या निविदांना ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळाला नाही. शिवाय चितळे रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी असलेली ही मोकळी जागा कमी किमतीत खासगी व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप राजकीय क्षेत्रातून झाल्याने जागा विकासाचा नादच महापालिकेने सोडून दिला. मनपानेच स्वखर्चाने हे मार्केट-व्यावसायिक संकुल उभारून कायमस्वरुपी उत्पन्न स्त्रोत सुरू करण्याचीही मागणी झाली. पण मनपाकडे पैसे नसल्याने हाही विचार बारगळला. या पार्श्वभूमीवर आता दोन वर्षपासून मनपाच्या खर्चातून मार्केट-व्यावसायिक संकुल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही मोकळी जागा सुमारे 11 हजार स्क्वेअर फुट असून, येथे डबल ’एफएसआय’ मिळणार आहे, शिवाय अन्य ठिकाणचा ’टीडीआर’ येथे घेता येणार असल्याने सुमारे 33 हजार स्वेअर फुट बांधकाम करता येणार आहे. व्यावसायिक गाळे व भाजीमार्केटच्या उभारणीतून मनपाला भाडेआकारणी तसेच घरपट्टी व पाणीपट्टीसह अन्य संकलित कराच्या रुपाने दुहेरी उत्पन्न यातून मिळणार आहे. येथे मार्केट इमारत नसल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विक्री करतात. त्यामुळे चितळे रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो.
No comments:
Post a Comment