राज्यावर कोरोनाचं मोठं संकट! ना. बाळासाहेब थोरात
पाहुण्यांना क्वारंटाईन करा
पारनेर मधील अनेक नागरिक व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त पुणे, मुंबईत आहेत. मुंबईत कोरोना वाढल्यामुळे ते पुन्हा पारनेरला परतत आहेत. पाहुण्यांमुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. त्यांना आल्या आल्या क्वारंटाईन करा असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी पारनेरकरांना दिला आहे.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचे संकट मोठे आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघर्ष करण्याचे आवाहन थोरात यांनी केले. सुरूवातीस एकूण रूग्णसंख्येच्या 60 टक्के रूग्ण राज्यात होते. आज आपण 30 टक्क्यांपर्यंत खाली आलो आहोत. इतर राज्यात मात्र रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जुन्या पिढीनेही साथीचे रोग पाहिले आहेत. त्याकाळातही लोक विलगीकरणात राहत होते. गावातून वाड्या वस्त्यांवर वास्तव्य करीत होते. विलगीकरण आपणास नवे नाही. विलगीकरण कटाक्षाने पाळले गेले पाहिजे असं आवाहन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
पारनेर मधील गणेश मंगल कार्यालयात बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली.याप्रसंगी ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचा मुंबई, पुण्याशी मोठा संपर्क असल्याने तेथून गावी आलेल्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्याच्या सुचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. पारनेर तालुक्यात अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या समन्वयातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवित असल्याचे सांगतनाच आमदार नीलेश लंके तसेच अधिकार्यांच्या कामाचेही थोरात यांनी कौतुक केले.
थोरात यांनी तालुका प्रशासनाचे कौतुक करताना लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगितले. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये इतर भागामध्ये चांगला अनुभव नाही. तेथील लोक गांभीर्याने घेत नाहीत. पारनेर तालुक्यात मात्र कोठेही लोक फिरताना दिसत नाहीत. दुकानेही बंद आहेत. येत्या 30 तारखेपर्यंत अशीच शिस्त पाळली तर पारनेर तालुक्याचा आकडा सर्वात कमी असेल असा विश्वास यांनी व्यक्त केला. मध्यंतरी रूग्णसंख्या कमी झाल्याने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन मर्यादीत करण्यात येत होते. मागणी वाढल्यानंतर उत्पादन वाढविण्यात आले असले तरी उत्पादनानंतर 15 दिवसानंतर इंजेक्शनचा वापर करता येतो. पंधारा दिवसांचा कालावधी येत्या दोन तिन दिवसांत संपणार असून त्यानंतर मात्र रेमडेसिवरचा पुरवठा मुबलक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऑक्सीजनचा तुटवडाही येत्या काही दिवसांत जाणवणार नाही असेही त्यांनी सांगितले. रेमडेसिवर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रूग्ण तसेच नातेवाईकांमध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत. कोणत्या स्थितीमध्ये ते इंजेक्शन द्यावे यासंदर्भात रूग्णांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे असे ते म्हणाले.
आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. सुधिर तांबे, जि. प. च्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संभाजी रोहोकले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment