भ्रष्ट व अकार्यक्षम नोकरशाहीवर लगाम लावण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कार्यालयाबाहेर वेतन फलक लावण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

भ्रष्ट व अकार्यक्षम नोकरशाहीवर लगाम लावण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कार्यालयाबाहेर वेतन फलक लावण्याची मागणी

 भ्रष्ट व अकार्यक्षम नोकरशाहीवर लगाम लावण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कार्यालयाबाहेर वेतन फलक लावण्याची मागणी

ऑब्झर्वर इफेक्ट तंत्राच्या वापरासाठी संघटनांचा पुढाकार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भ्रष्ट व अकार्यक्षम नोकरशाहीवर लगाम लावण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांचे कार्यालयाबाहेर वेतन फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑब्झर्वर इफेक्टचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तसेच कोरोनाच्या काळात लाखो रुपये पगार असून, काम न करणार्या अधिकार्यांचे 50 टक्के पगार कपात करुन, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी निधी उपकब्ध करण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने धरण्यात आला आहे.  
स्वातंत्र्यानंतर 74 वर्ष नोकरशाही पगार हमी योजनेवर कार्यरत असून, त्यामुळे देशाचा विकास खुंटला आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांच्या टंगळमंगळ व भ्रष्ट कारभाराने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. कोणतेही सरकार सत्तेवर आले, तरी यंत्रणेत बदल होत नाही. नोकरशाहीच्या भ्रष्ट व अकार्यक्षमतेबद्दल बोंबा मारून देखील काहीच परिणाम होत नसल्याने त्यांच्यावर ऑब्झर्वर इफेक्ट तंत्राचा वापर करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.
लाखो रुपये पगार असलेले अधिकारी कर्तव्यात कसूर करुन सर्वसामान्यांचे कामे करीत नाही. त्यामोबदल्यात त्यांना पाचशे, हजार रुपयांची लाच अपेक्षित असते. विवेक गहाण ठेवून अनेकांना पैशाची मागणी केली जाते. न्यायाधीश, शिक्षक व सरकारी अधिकारी दिवस भरविण्याचे कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात देशाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. लोक मरत आहेत, डॉक्टर लुटत आहेत. जनतेचा राज्यकर्त्यांवर अंकुश राहिलेला नाही. मत विक्री व जाती मंडूक लोकांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून, त्यांना लोकप्रतिनिधींना जाब विचारायचा अधिकार देखील उरलेला नाही. देशात तमस पर्व सुरु झाले असून, सर्व आपली घरे भरण्याच्या तयारीत आहे. भ्रष्ट व अकार्यक्षम नोकरशाहीवर लगाम लावण्यासाठी त्यांच्या पगार पत्रकाचे फलक कार्यालयाबाहेर लावल्यास त्यांना चिरीमिरी घेताना लाज वाटणार आहे. यासाठी ऑब्झर्वर इफेक्टचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे, पोपट भोसले, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment