डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श - भैय्या (महेंद्र) गंधे
भाजपाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भेया(महेंद्र) गंधे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने मार्केट यार्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भेया) गंधे महापौर बाबासाहेब वाकळे , सभागृह नेते रवींद्र बारस्कर,अनिल सबलोक, उमेश साठे, खामकर, ऋग्वेद गंधे आदि उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना भेय्या गंधे म्हणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. त्यामुळेच आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले पाहिजे. यासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यावेळी बोलतांना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले, असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र बारस्कर, उमेश साठे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment