‘रेमडेसिव्हीर’साठी पळापळ! अंत्यसंस्कारासाठी ही ‘वेटींग’
खाजगी हॉस्पिटलांची लाखोंची पॅकेजेस.. प्रशासनाचे दुर्लक्ष..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेमडीसीवर इंजेक्शनसाठी काळ्याबाजारात 10 हजार रुपये मोजावे लागत आहेत, शहरातील मोठ्या हॉस्पिटलने उपचारासाठी लाखोंचे पॅकेजेस केले आहेत. कोरोनामुळे भयभीत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेवून लुटण्याचे प्रकारही अधिक वाढले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना कोरोना बधीतांच्या वाढत्या संख्येने हॉस्पिटलमध्ये बेड व उपचार मिळणेही कठीण झाले आहे. त्यातच गंभीर झालेल्या रुग्णांसाठी रेमडीसीवर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे. चांगले उपचार मिळण्यासाठी रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर होणार्या भरमसाठ बिलाची भीती नागरिकांमध्ये आहे. कोरोना बाधिताच्या अंत्यसंस्कारासाठीही दोनदोन दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. यात मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. या संकट काळात माणुसकी जपत देवासारखे धावून येवून मदत करणारेही आहेत, तर काहीजण परिस्थीतीचा गैरफायदा घेत नागरीकांची लुट करत माणुसकीला काळिमा फासत आहेत. शहरातील तारकपूर भागातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका नागरिकाचे उपचार दरम्यान कोरोनामुळे निधन झाले. त्यावेळी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी अमरधाम मध्ये नेण्यासाठी हॉस्पिटलमधील अँब्युलन्ंसची मागणी केली असता अॅम्बुलन्सच्या मालकाने अॅम्बुलन्सला भरपूर मागणी असल्याने मृतदेह अमरधाममध्ये नेण्यासाठी तब्बल 8 हजार रुपयांची मागणी केली. तारकपूर ते अमरधाम या किरकोळ अंतरासाठी अॅम्बुलन्सने 8 हजार रुपयांची मागणी करणे हा माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार होता. शेवटी मृताच्या नातेवाईकांनी अॅम्बुलन्सच्या मालकाला विनंती करून साडेचार हजार रुपये देवून मृतदेह अमरधाममध्ये नेला. घरातील कर्त्याचे निधन झाल्याने आधीच दु:खाचा मोठा डोंगर सर्वसामान्य कुटुंबावर कोसळलेला असताना अशा संतापजनक घटना घडत आहेत. आज कित्तेक गरीब नागरिकांचाही बळी कोरोनामुळे जात आहे. त्यांच्याही नातेवाईकांना याच प्रकारे सर्वस्तरातून मोठ्याप्रमाणात लुटले जात आहे. जर माणुसकी थोडीफार जागृत असेल तर हे थांबले पाहिजे.
नागरिकांची होणारी लुट व औषधोपचारासाठी होणारी भटकंती प्रशासनाने लक्ष घालून तातडीने थांबवली पाहिजे. याबाबत आवाज उठणे आवश्यक आहे. प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांची लुट थांबण्यासाठी चांगल्या उपाय योजना राबवून लुट करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून आता होवू लागली आहे.
No comments:
Post a Comment