भुयारी गटाराच्या नित्कृष्ट कामाविरोधातील शिवराष्ट्र सेनेचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरासाठी केंद्र व राज्य सरकार व मनपाने मंजूर केलेले 125 कोटी रुपये खर्च करुन सुरु केलेली अमृत योजनेचे सुरु असलेल्या निकृष्ट कामाबाबत मनपाने अटी व शर्तीचा भंग केला म्हणून ठेकेदारास दंड करावा व काळ्या यादीत समावेश करावा. मुळ ठेकेदाराला सब ठेकेदार निवडता येत नसून, प्रशासनाने ज्या अधिकार्यांनी परवानगी दिली, त्यांच्यावर कारवाई करावी. ठेकेदाराला पिण्याच्या पाईप दुरुस्त करण्यासाठी मदत करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी. ठेकेदाराने पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. यासाठी दि.24 पासुन शिव राष्ट्र सेनेच्यावतीने पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु केले होते.
याबाबत मनपा उपायुक्त श्री.डांगे यांनी उपोषणकर्त्यांशी या विषयावर चर्चा करुन अमृत योजनेच्या सुरु असलेल्या कामाबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने उपस्थित केलेल्या मुद्यांची पडताळणी करुन संबंधित ठेकेदाराकडून हे काम उत्कृष्ट पद्धतीने करुन घेऊ. तुटलेले पाईप दुरुस्ती व पॅचिंग करण्याचे काम तातडीने करणे व 31 मे 2021 अखेर रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
याप्रसंगी शिव राष्ट्र सेनेचे दलित आघाडी प्रमुख अनिल शेकटकर, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बाबासाहेब कर्पे, शेतकरी आघाडीचे सचिव भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब जगधने, युवा प्रमुख शंभु नवसुपे, कामगार सेना अध्यक्ष संतोष मांडे, गणेश शेकटकर, दत्तात्रय घोडके, साहेबराव नेटके, राहुल शेकटकर, इंजि.आर.जी. सातपुते आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, शहराच्या विकासाला बाधा ठरत असून, नागरिक पोटाला चिमटे घेऊन नगर पालिकेची विविध स्वरुपाची कर भरत असून, त्या पैशावर एक प्रकारे दरोडाच ठेकेदार एजन्सी टाकत आहे. या विरोधात शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने हे अमरण उपोषण सुरु केले होते. ही योजना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी ठरली आहे. यात सर्व लोकप्रतिनिधी व पक्ष गप्प असून चकार शब्द काढत नसून, ऐरवी महासभेत एकमेकांच्या अंगावर पडणारे लोकप्रतिनिधी गप्प का? तसेच या योजनेतील ठेकेदार एजन्सीला कराराप्रमाणे रस्ते पॅचिंग, पाईप तुटल्यास दुरुस्ती हे सर्व काम ठेकेदार एजन्सीकडे आहे, परंतु शिव राष्ट्र सेना पक्षाच्या निदर्शना गंभीर बाब आली असून, मनपा इंजिनिअर हे मनपाचे कर्मचारी व 700 ते 800 रुपये तासाचा जेसीबी लावून शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करतात. मग प्रश्न असा पडतो की, ठेकेदार हा मनपाचा जावई आहे का? सध्या भुयारी गटार पाईप हे निष्कृष्ट दर्जाची असून, लोडची वाहने गेल्यास ती दबून तुटतील व पाईपलाईन अथरतांना कुठलेही काँक्रीट नसून मोकळेच टाकलेले आहे मग हे काम 20 वर्षे टिकेल कसे, यावर देखरेख करणारे अधिकारी व इंजिनिअर घरीबसून काम करतात, नाही तर रजेवर असतात. त्यामुळे ठेकेदार एजन्सीने मनमानी कारभार सुरु केलेला आहे. शहरातील अकुशल कामगारांमार्फत काम चालू आहे. मुख्य ठेकेदाराने दोन-तीन सब ठेकेदारांकडे काम दिलेले असून, कराराचा अक्षरश: भंगच होत आहे. महिनेनो महिने खड्डे खाणून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नावाला भुयारी गटार हा शब्द प्रयोग आहे. परंतु भविष्यातून घुस किंवा उंदीरसुद्धा जावू शकणार नाही. कालांतराने चेंबर तुुंबून रस्त्यावर पाणी वाहणार आहे.
या आधीसुद्धा याच मुद्द्यावर शिव राष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात आलेले आहे. व चार ते पाचवेळेस निवेदनही देण्यात आले आहे, परंतु प्रशासनाने गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे शिव राष्ट्र सेनेने अमरण उपोषण सुरु केले होते.
No comments:
Post a Comment