दोषींना पाठीशी घालणार नाही - अजित पवार
मुंबई ः दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. सचिन वाझे प्रकरणावर माध्यमांनी अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं.
मात्र, यावेळी अजित पवार म्हणाले, चौकशीआधी कुणाला शिक्षा देणं योग्य नाही. सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आलंय. जर कुणी अधिकारी चुकीचा वागला, जर तो दोषी आढळला, तर सरकारनं कुणीच पाठीशी घातलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
तसंच, गृहमंत्र्यांना हटवलं जाणार का, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं हे त्या त्या पक्षाचा प्रमुख ठरवतो. काँग्रेसकडून सोनिया गांधी, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेत असतात. सचिन वाझे प्रकरणी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद नाहीत, असंही यावेळी अजित पवार यांनी नमूद केलं.महाराष्ट्राच्या राजकारणातल्या हालचाली वाढल्या आहेत. सकाळी निवडक मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतल्यानंतर, आता सर्व मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या ’वर्षा’ या शासकीय निवासस्थानीच ही बैठक होणार आहे. या बैठकीत कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या बैठकीत सचिन वाझे यांच्यावर चर्चा होणार का, किंवा सध्या चालू असलेल्या घडामोडींचा विषय चर्चेत असेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज सकाळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ’वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक झाली. सकाळच्या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र, नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकलं नाही.सकाळच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, अनिल परब हे या बैठकीत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment