आर्थिक व्यवहारावरून अपहरणाची खोटी फिर्याद देणार्‍याविरूद्धच गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

आर्थिक व्यवहारावरून अपहरणाची खोटी फिर्याद देणार्‍याविरूद्धच गुन्हा दाखल

 आर्थिक व्यवहारावरून अपहरणाची खोटी फिर्याद देणार्‍याविरूद्धच गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः आपल्या मुलाचे अपहरण केले असलेच्या दिलेल्या फिर्यादीची चौकशी करत असताना जामखेड पोलीसांच्या समोर वेगळाच प्रकार आला. यामध्ये झालेली घटना ही अपहरण नसून आर्थिक व्यवहारावरून खोटा गुन्हा दाखल करण्याची असल्याचे निदर्शनास आले. यावरून शोभा सवई राठोड या 55 वर्षीय रा. धनगरवाडी, ता. दारव्हा, जिल्हा यवतमाळ या महिलेच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सविस्तर असे की, सदर गुन्ह्यातील आरोपी शोभा सवई राठोड या 55 वर्षीय रा. धनगरवाडी, ता. दारव्हा, जिल्हा यवतमाळ या महिलेने दि. 14 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मोहा ता जामखेड येथे यातील आरोपी श्रीपाल भारत वसेकर रा. टाकळी सिकंदर ता. मोहळ जिल्हा सोलापूर वगैरेंनी संगनमत करून माझा मुलगा प्रेम सवाई राठोड यास काळ्या रंगाच्या सफारी गाडीतून नेलेले आहे. अशी फिर्याद शोभा सवई राठोड या महिलेने दिली होती. या वरून श्रीपाल वसेकर वगैरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने पोलीस पथक तयार करून आरोप व अपहरण केलेला प्रेम राठोड यांच्या तपासासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथे रवाना केले. त्यानुसार या पथकाने कसून शोध घेतला व वरिल लोकांना ताब्यात घेऊन जामखेड पोलिस स्टेशन येथे आणले.
    सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी पोलीस चौकशी सुरू केली असता, एक वेगळाच जामखेड पोलीसांच्या समोर आला. यातील फिर्यादी शोभा राठोड व तीचा मुलगा प्रेम राठोड यांनी आम्ही तुम्हाला ऊस तोडणीसाठी मजूरांची टोळी देतो, असे सांगून श्रीपाल वसेकर यांच्याकडून 2 लाख रुपयांची उचल घेतली होती. त्यातून आणखी व्यवहार होऊन प्रेम राठोड हा दारव्हा येथून मोहा येथे उसतोडीसाठी आला होता. असा काहीसा प्रकार असताना शोभा राठोड या महिलेने अपहरणाचा गुन्हा घडलेला नसताना आपल्या कायदेशीर अधिकाराचा बेकायदेशीर वापर करत अर्थिक व्यवहाराच्या रागातून पोलीसांनी आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून आरोपीला अटक करावी व श्रीपाल वसेकर वगैरें विरोधत कायदेशीर कारवाई करावी या हेतूने व सुडबुद्धीने खोट्या स्वरूपाची तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. यावरून सदर महिला शोभा राठोड हिचे विरोधत तपासी अंमलदार संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय लाटे व कॉन्स्टेबल सचिन पिरगळ हे करत आहेत.
   यापुर्वीही असे अनेक प्रकार झालेले आहेत. मात्र यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आपल्या कार्यकुशलतेने हा प्रकार उघड केल्याने निरपराध व्यक्तींना विनाकारण होणार्‍या त्रासापासून सुटका केली आहे.

No comments:

Post a Comment