जिल्हा परिषद शाळांचा गुणवत्तेचा दर्जा तपासण्यासाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचा प्रगती सूर्यनामा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तपासण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचा प्रगती सुर्यनामा केला जाणार आहे. शिक्षक राजकारण, जमीन व्यवहार, इतर व्यवसायात गुंतले असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे सिध्द करण्यासाठी गावातील भर चावडीवर हा सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
राज्य सरकारने कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण सक्तीचे व मोफत केले. यामुळे मोठ्या प्रमाणात शाळाबाह्यमुळे शाळेत जाऊ लागली आहेत. मात्र त्यांना लिहिता वाचता येत नसल्याची शोकांतिका आहे. शिक्षकांना मोठ्या प्रमाणात पगार असल्याने त्याचा उपयोग ते जमीन व्यवहार व इतर व्यवसायात करीत आहे. मात्र मुलांना शिक्षण देण्याचा मुख्य उद्देश बाजूला पडत आहे. चौथीच्या वर्गातील मुलाला वाचता देखील येत नसल्याने त्यांना फक्त शाळेत पाठवणे हा हेतू नसून, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हे देखील काळाजी गरज बनली आहे. शिक्षणाने समाजात क्रांती घडली आहे. मुलांना शिक्षण दर्जेदार मिळण्यासाठी संघटनेचा पुढाकार असून, शिक्षण तज्ञ हेरब कुलकर्णी यांच्या सहकार्याने गावागावात जाऊन सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचा प्रगती सुर्यनामा केला जाणार आहे. ऑब्झर्वर इफेक्टचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळण्याचा संघटनेचा प्रयत्न असून, कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, फरिदा शेख, वीरबहादूर प्रजापती आदी प्रयत्नशील आहेत.
No comments:
Post a Comment