मुळ मालकाविरोधातील मनाई हुकूमाच्या आदेशाची चौकशी करण्याची मागणी
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती व जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश यांना निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गुप्त धनासाठी फसवणूक करणारा भोंदू बाबा व त्याचे साथीदारांनी शेत जमीन खाजगी सावकाराच्या खश्यात टाकली असताना, सदर सावकाराने जमीनीचा खोट्या कागदपत्राद्वारे ताब्याशिवाय खरेदी घेऊन विक्री केली असल्याचा आरोप जमीनीचे मुळ मालक बाळू लक्ष्मण पवार व संपत लक्ष्मण पवार यांनी केला आहे. या जमीनीचे मुळ मालक पवार बंधू यांनी कॅव्हेट (सावधानपत्र) दाखल केलेले असताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कर्जत न्यायालयाने मुळ मालकाविरोधातच मनाई हुकूम दिल्याने या आदेशाची चौकशी होण्याच्या मागणीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती व अहमदनगर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.
बाळू लक्ष्मण पवार व संपत लक्ष्मण पवार यांची भांडेवाडी (ता. कर्जत) येथे 186 गट नं. मध्ये 1 हेक्टर 99 आर शेत जमीन आहे. सदर जमीन सावकाराने जमीनीचा खोट्या कागदपत्राद्वारे ताब्याशिवाय खरेदी घेऊन विक्री केली असल्याचा त्यांचा आरोप आहे. हे प्रकरण कर्जत न्यायालयात सुरु असताना त्यांनी कॅव्हेट (सावधानपत्र) दाखल केले होते. दि.4 मार्च 2021 रोजी कर्जत येथील ज्येष्ठ वकिल अॅड.शरद कदम यांच्या निधनाने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय वकिलांनी घेतला होता. पवार यांचे वकिल घरी गेले असताना प्रतिवादींनी दावा दाखल करुन मुळ मालक असलेले पवार यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता त्यांच्याविरोधात मनाई हुकूम काढला आहे. हा निकाल देताना सदर जमीन अनेक वर्षापासून कोणाच्या ताब्यात आहे. याचा विचार करण्यात आलेला नाही. कॅव्हेट (सावधानपत्र) दाखल केलेले असताना नोटीस न बजावता एकतर्फा निकाल काढणे चुकीचे असून, या विरोधात चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment