सामाजिक भावनेतून केलेले कुठलेही काम इतरांना प्रेरणा देणारे ः चव्हाण
गोरगरीब, गरजू व वृद्धांना शुभम टाक यांच्याकडून अन्नदान
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागतिक महामारी कोरोनामुळे अनेकांवर मोठे संकट ओढवले आहे. सद्य परिस्थितीत अनेकजण एकमेकांची काळजी घेत आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान जपत अनेक संस्था, व्यक्ती समाजात काम करीत आहेत. माणुसकी जिवंत असल्याचे हे द्योतक आहे. हे संकट लवकरच दूर होऊन पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत, अशी प्रत्येकजण मनोमन प्रार्थना करीत आहे. सामाजिक भावनेतून केलेले कुठलेही काम इतरांना प्रेरणा देणारे असते, असे प्रतिपादन जे.सी. असोसिएट अॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक जयेश चव्हाण यांनी केले.
वाल्मिक समाज बांधवांच्या वतीने शुभम टाक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिंगार येथील श्री रोकडेश्वर मंदिरात गोरगरीब, गरजू व वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी श्री. जयेश चव्हाण बोलत होते. याप्रसंगी सूरज गोहेर, विशाल झुंज, किरण तागडकर आदींसह समाजबांधव व मित्रपरिवार उपस्थित होता. आमदार संग्राम जगताप यांनी शुभम टाक यांचा सत्कार करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, वाल्मिक समाजातील शुभम टाक हा कार्यकर्ता असून, समाजासाठी काही तरी करण्याची त्याची नेहमीच धडपड सुरू असते. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सावरत नाही, तोच दुसरी लाट सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सद्य परिस्थितीत प्रत्येकजण धास्तावलेला आहे. एकमेकाला आधार देऊन त्यांना मदत करण्याची गरज आहे. श्री. टाक यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्च न करता अन्नदान केले. हा चांगला उपक्रम असून, यापासून इतरांनी बोध घ्यावा. दरवर्षी ते अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करतात, असे ते म्हणाले.
श्री. शुभम टाक म्हणाले की, आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा हा समाजातील वंचित घटकांसाठी खर्च केला पाहिजे. श्री रोकडेश्वर मंदिरात माझ्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्याची इच्छा होती, ती पूर्ण केली. या ठिकाणी उपस्थित गोरगरीब, गरजू व वृद्धांंच्या चेहर्यावरील समाधानाचे भाव पाहून मनोमन आनंद होतो. दुसर्याच्या कामी येण्याचा आनंद काही औरच असतो. सद्य कोरोना परिस्थितीत सामाजिक भावनेतून नागरिकांना मदतीचा ओघ मित्रपरिवाराच्या माध्यमातून सुरूच ठेवू, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज गोहेर यांनी केले, तर किरण तागडकर यांनी आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment