तलाठ्यांना आवक-जावक नोंदवही बंधनकारक करावी-योगेश गेरंगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

तलाठ्यांना आवक-जावक नोंदवही बंधनकारक करावी-योगेश गेरंगे

 तलाठ्यांना आवक-जावक नोंदवही बंधनकारक करावी-योगेश गेरंगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महसूल विभाग म्हणजे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या पिळवणूकीचे जणू केंद्रच आहे. महसूलच्या कोणत्याही कार्यालयात कोणतंही काम वेळेत मार्गी लागत नाही. देशभरात सर्व काही ‘ऑनलाईन’ झाले आहे. अन शासकीय कार्यालयातील पांढरपेशी कारभार हद्दपार झाला असल्याच्या बाता मारल्या जात असल्या तरी महसुली कामात मात्र दफ्तर दिरंगाईमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार चकरा मारल्याशिवाय आणि ‘अर्थ’पूर्ण बोलणी खेरीज काम मार्गी लागत नाही. या परिस्थितीकडे एका शेतकरी पुत्राने थेट जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत इसळक ता. नगर येथील शेतकरी पुत्र, अ‍ॅड. योगेश रावसाहेब गेरंगे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना मंगळवारी ( दि. 16 मार्च ) निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक तलाठी कार्यालयांमध्ये नोंदीस येणारे दस्त, तत्सम कागदपत्रे यांची आवक - जावक रजिस्टरमध्ये नोंद घेतली जात नाही. किंबहुना अनेक कार्यालयांमध्ये आवक जावक रजिस्टरच नाहीत. तलाठी कार्यालयाकडून प्राप्त अर्जांची पोहच दिली जात नाही. परिणामी फक्त तोंडी पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे शेतकरी, सामान्य जनतेला वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘या’ प्रलंबित प्रकरणांची शासन दरबारी नोंदच होत नसल्याने संबधित कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई होतानाही दिसत नाही. त्यामुळे अनेक जण न्यायापासून वंचित आहेत.’
तरी याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी अ‍ॅड. गेरंगे यांनी केली आहे. तलाठी कार्यालयांमध्ये प्राप्त अर्जांची नोंद  आवक जावक रजिस्टरमध्ये घेण्यात यावी. या मागणीमुळे महसूल विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर येतील. शेतकर्‍यांच्या तलाठी कार्यालयातील चकरा कमी होतील. त्यामुळे जिल्हाधिकारी काय भूमिका घेतील, याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे.
हेच भ्रष्टाचाराचे कुरण आहे...
तलाठी प्राप्त अर्जांवर पोहच देत नाहीत, शिवाय रजिस्टरमध्ये नोंद करत नाहीत. त्यामुळे तलाठ्यांकडून होणार्‍या दिरंगाईचा अर्जदाराकडे कोणताही पुरावा राहत नाही. त्यामुळे तक्रार करता येत नाही. वर्ष सहा महिने उलटले की, कार्यालयात दिलेला दस्त सापडत नाही. मग पुन्हा अर्ज करावा लागतो. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातूनच मग आर्थिक व्यवहारांना चालना मिळते. हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याने जिल्हाधिकारी यांनी शासन नियमानुसार आवक जावक रजिस्टरला नोंद करणे बंधनकारक करावे. कर्तव्यात कसूर करणार्‍या ‘कामचुकार’ तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड.योगेश गेरंगे यांनी केली आहे.
निंबळक तलाठ्यांनाही विनंती पत्र...
अ‍ॅड. योगेश गेरंगे यांनी 15 मार्च रोजी निंबळक येथील तलाठी कार्यालयाकडे प्राप्त अर्जांची नोंद आवक जावक रजिस्टरमध्ये करण्यात यावी, अशी मागणी करणारे विनंती पत्र दिले आहे. तलाठी प्राजक्ता साळवे यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. तलाठी कार्यालयात आवक - जावक नोंदवही आहे, प्राप्त अर्जावर पोहच दिली जातअसल्याचा खुलासा तलाठी साळवे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment