स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्‍याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्‍याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव

 स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्‍याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोजगार व निवार्याचा प्रश्न एकाच वेळेला लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून शहरालगत असलेल्या खडकाळ पड जागेचा वापर करुन सोयी-सुविधा उपलब्ध करुन निवारा व उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न एकाचवेळी सोडविण्याची संकल्पना उद्योग ग्राममध्ये असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.
   स्वातंत्र्यानंतर निवडणुकांमध्ये गरिबी हटाओच्या फक्त घोषणा व आश्वासने देण्यात आली. मात्र ठोस उपाययोजना नसल्याने सर्वसामान्यांची गरिबी हटली नाही. सर्वसामान्यांना आर्थिक समृध्द करण्यासाठी आर्थिक मानसशास्त्राचा उपयोग करणे गरजेचे आहे. अंबानी यांनी या तंत्राचा उपयोग करुन जगात श्रीमंत होण्याचा मान मिळवला. लोकांची गरज ओळखून सेवा दिल्यास त्याचा लाभ उद्योजक व व्यावसायिकांना होणार आहे. शहरालगत मोठ्या प्रमाणात खडकाळ पड जमीन उपलब्ध आहेत. या जागेवर बेघरांना निवारा व औद्योगिकतेसाठी भूखंड उपलब्ध करुन दिल्यास भारताचे कौशल्याचा विकास साधला जाऊन निवारा व रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. तर लघु उद्योजकांचे मोठे जाळे पसरण्यास मदत होणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  
   खडकाळ, नापीक जमीनीचा उपयोग करुन लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेद्वारे उद्योग ग्रामच्या माध्यमातून बेघरांना घरासाठी 80 हजार रुपयात एक हजार चौरस फुटाचा भूमीगुंठा तर  लघु उद्योगासाठी 5 हजार चौरस फुटाचा भूखंड 4 लाख रुपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जागा देणार्या मुळ शेतकर्याला विकसीत जमीनीचा 30 टक्के भाग परतावा म्हणून मिळणार आहे. 40 टक्के जमीन रस्ते अ‍ॅमेनिटीसाठी तर 30 टक्के जमीन औद्योगिक भूखंड जागा विकसीत करणार्या ठेकेदाराला उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी जागा देणार्या शेतकर्यांचा व भूखंड विकसीत करणार्य ठेकेदाराचा मोठा फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment