अन्नसेवेच्या उपक्रमातून आनंद महिमा किती महान आहे याची प्रचिती : महेंद्रऋषीजी महाराज
आनंदधाम फौंडेशनच्या अन्नसेवेच्या वर्षपूर्तीनिमित्त पुरणपोळी, आमटी, भाताचे जेवणनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पूज्य आचार्यश्रींच्या आनंद नामाचा महिमा विलक्षण आहे. त्यांच्या कृपाशिर्वादाने सुरु झालेले कोणतेही सत्कार्य अखंड अविरत चालते. आनंदधाम फौंडेशनने आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला. तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे. यातूनच आनंदमहिमा किती महान आहे याची प्रचिती येते. भुकेलेल्यांना सुग्रास, सकस अन्न देण्याचा हा उपक्रम मानवतेचे प्रतिक असून अशा मानवसेवेतूनच जग लवकर करोना महामारीतून मुक्त होईल असे शुभाशिर्वाद युवाचार्य पूज्य महेंद्रऋषीजी महाराज यांनी दिले.
आनंदधाम फौंडेशनने अन्नदानाचे मोठे कार्य सुरु करीत भुकेलेल्यांना अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम आनंदधाम परिसरात चालवला आहे. या उपक्रमाची 28 मार्चला वर्षपूर्ती झालीे. आचार्यश्रींचा पुण्यस्मृतीदिन आणि होळीचे औचित्य साधून आनंदधाम फौंडेशनने सर्वांना मोफत पुरणपोळी, आमटी,भात असे जेवण सोमवारी उपलब्ध करून दिले. या उपक्रमाच्या शुभारंभावेळी पूज्य महेंद्रऋषीजी महाराज, पूज्य पूज्य हितेंद्रऋषीजी महाराज यांनी मांगलिक दिली. याप्रसंगी मर्चंटस बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, उद्योजक किशोर मुनोत (नेवासकर), आनंदधाम फौंडेशनचे अध्यक्ष राजकुमार चांदमल चोपडा, उपाध्यक्ष भास्कर पवार, सेके्रटरी अभय लुणिया, खजिनदार आनंद चोपडा, अनिल दुगड, प्रितम गांधी, संतोष गांधी, राहुल सोनीमंडलेचा, चेतन मुथियान, नितीन शिंगी, राजू गांधी आदी उपस्थित होते.
पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके म्हणाले की, मागील वर्षी मार्चमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाल्यावर हातावर पोट असणारांसमोर रोजच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी आनंदधाम फौंडेशनने अन्नसेवेच्या कार्याला सुरुवात केली याचा मी स्वत: साक्षीदार आहे. जवळपास दोन अडीच महिने या उपक्रमातून हजारो लोकांना रोजचे जेवण देण्यात आले. लॉकडाऊननंतरही फौंडेशनने हा उपक्रम चालूच ठेवत फक्त दहा रुपयात सकस जेवण उलपब्ध करून दिले आहे. ही मानवसेवा कौतुकास्पद असून भविष्यातही ती अशीच चालू राहिल असा विश्वास आहे.
मर्चंटस् बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत म्हणाले की, आचार्यश्रींच्या पुण्य स्मृतीला वंदन करून सुरु झालेला हा अन्नसेवेचा उपक्रम खरीखुरी मानवसेवा आहे. या कार्यात सहभागी होणे, योगदान देता येणे ही भाग्याची गोष्ट आहे. अशा उपक्रमातूनच माणुसकीचे नाते घट्ट होण्यास मदत होते.
खजिनदार आनंद चोपडा यांनी सांगितले की, आनंदधाम भक्तनिवाससमोर नाममात्र 10 रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी, तीन चपाती, ठेचा, चटणी तसेच पुलाव, दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते. सेवाभाव जपताना जेवण अतिशय हायजेनिक वातावरणात आणि चांगल्या मटेरियलपासून तयार होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला असून भविष्यातही ही अन्नसेवा कायम चालू ठेवणार आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व साधूसाध्वीजींच्या आशिर्वादानेे प्रारंभ झालेल्या या सेवेसाठी पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले. याशिवाय जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्यासह विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट, शहरातील दानशूर मंडळींचे सक्रिय योगदान लाभत आहे. अभय लुणिया यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment