भिंगारच्या ‘एफएसआय’चा प्रश्न सोडविणे हीच राठोड, गांधी, पिल्ले, पाटील यांना श्रद्धांजली ठरेल
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्व. अनिल राठोड, स्व.दिलीप गांधी आणि स्व.रामकृष्ण पिल्ले यांनी आपापल्या पक्षावर निष्ठा कायम ठेवून, पक्षविरहित लोक जोडण्याचे काम केले तसेच लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. भिंगारचा पूल, पाणीप्रश्न, किल्ला सुशोभिकरणाचे मुद्दे या तिघांनी आक्रमकपणे मांडले. भिंगारच्या एफएसआयचा प्रश्न हा तिघांच्याही जिव्हाळ्याचा होता. मात्र तो अद्याप सुटला नसल्याने त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन तो प्रश्न सोडविला तर तीच खर्या अर्थाने या चौघांनाही श्रद्धांजली ठरेल, असे मत कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे यांनी व्यक्त केले.
भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात स्व.अनिल राठोड, स्व.दिलीप गांधी, स्व.रामकृष्ण पिल्ले व ज्येष्ठ नागरिक संघाचे स्व.अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील या चौघांना भिंगार शहर वासियांच्यावतीने सर्व पक्षिय श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे अध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे होते तर व्यासपीठावर भाजपा महिला उपाध्यक्ष व माजी कॅन्टों.बोर्ड सदस्या सौ.शुभांगी साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ, काँग्रेसचे प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे, स्व.पिल्ले यांचे ज्येष्ठ बंधू गोपाळराव पिल्ले, सेवा दल उपाध्यक्ष सौ.कौसर महेमुद खान आदि उपस्थित होते.
स्व.अनिल राठोड यांचा भिंगारवर विशेष लोभ होता. साध्या कार्यकर्त्याने फोन केला तरी काही मिनिटात अनिल भैय्या हजर होत असत. असेच काही किस्से दिलीप गांधींच्या बाबतीत होते. या दोघांनीही भिंगारसाठी आपआपल्यापरिने समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. अॅड.रामकृष्ण पिल्ले हे सलग तीन वेळा कॅन्टों.बोर्डचे उपाध्यक्ष होते. त्यावेळीही त्यांनी विकासाची अनेक कामे केली. भिंगार एस.टी.स्टॅण्ड, सदर बाजार ही बाजारपेठ पिल्ले यांच्या कारकर्दीत वसली तर सुभाषचंद्र पाटील यांचे ज्येष्ठ नागरिक संघासाठीचे काम उल्लेखनिय असून, या चारही व्यक्तींनी भिंगारसाठी मोलाचे योगदान दिले आहे, अशा भावना सर्व पक्षिय श्रद्धांजली सभेत विविध वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.
जिल्हा काँग्रेसचे अॅड.साहेबराव चौधरी, ज्येष्ठ काँग्रेस नेते अनिल परदेशी, भाजपाच्या सौ.साठे, शहर काँग्रेसच्या सरचिटणीस नलिनी गायकवाड, काँग्रेसचे श्री.वाघस्कर, भाजपाचे अध्यक्ष वसंत राठोड, राष्ट्रवादीचे श्री.सपकाळ, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वंचित बहुजन आघाडीचे विकास चव्हाण, नगर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, विशाल बेलपवार, शुभम पिल्ले आदिंची समयोचित भाषणे झाली.
No comments:
Post a Comment