कापड बाजारातील अनधिकृत अतिक्रमण काढून समाजकंटकांवर कारवाई करावी
जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानची निवेदनाद्वारे पोलिस अधिक्षक व आयुक्तांकडे मागणीनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कापड बाजारातील अनाधिकृत अतिक्रमणे काढावीत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाज कंटकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त यांना संयुक्तरित्या दिले. याप्रसंगी अध्यक्ष किरण डफळ, गणेश झिंजे, ज्ञानेश्वर पातळे, गणेश ढाणके, श्रावण सदाफुले, अमित डाके, वैभव जठार आदि उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि.14 मार्च 2021 रोजी कैलास दरांगे या रिक्षा चालकावर आणि त्याच्या कुटुंबियांवर किरकोळ कारणावरुन काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कैलास दरांगे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. आरोपींवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत.
कापड बाजारातील घासगल्ली, शहाजी रोड, नवीपेठ, महात्मा गांधी रोड, मोची गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच पथविक्रेत्यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे अतिक्रमणे केलेली आहेत. या अतिक्रमाणामुळे रस्त्यावरुन पायी चालणेही मुश्किल झाले आहे. सदरील अतिक्रमण असलेल्या परिसरात गर्दीच्या दिवशी महिलांची छेडाछाड होते. अश्लिल शेरेबाजी करण्यात येते, त्यामुळे कायमच इथे वादविवाद होत असतात. प्रसंगी बाजारात दरवेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात आतापर्यंत विविध राजकीय पक्षांनी, संघटनांनीही आणि बाजरातील व्यापार्यांनी वेळोवेळी पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेने कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदने दिलेली आहेत.
कैलास दरांगे आणि त्यांच्या कुटूंबियांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे बाजारातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस प्रशासनाने गस्ती पथक तैनात करुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा तसेच महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करुन बाजारातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment