उद्योजकांचे प्रश्न, पर्यावरण व सुरक्षितता यासाठी ‘मार्ग’ संघटना व उद्योजकांनी पुढाकार घ्यावा ः पवार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरच्या औद्योगिक क्षेत्राची वाटचाल यशस्वीतेकडे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. सुपा एमआयडीसी हि नावारुपास येत आहे, हे पाहून आनंद होत आहे. ही यशस्वी घौडदौड आणखी वाढीस लागावी यासाठी महत्वाचे असलेले उद्योजकांचे प्रश्न, पर्यावरण व सर्वांची सुरक्षितता यासाठी ‘मार्ग’ संघटनेने व उद्योजकांनी पुढाकार घ्यावा व येत्या काळात औद्योगिक परिषदचे आयोजन करावे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आपणास हवे असलेले सहकार्य आपण मिळवून देऊ. आपल्या यशस्वी जीवनपटलावर बोलतांना म्हणाले, मला क्रिकेटयर व्हायचे होते. राज्यपासून देशपातळीवर मी क्रिकेट खेळलो, यातून जय-पराजय पचावायला शिकलो. हीच बाब माझ्या भविष्यासाठी मोलाची ठरली.अनेक सामाजिक उपक्रम राबवितांना अडीअडचणींचा, परिस्थितीवर मी मात करु शकलो. ही खिलाडूवृत्ती सर्वांनी कायम जपावी व सुरक्षित व यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी . सर्व जगामध्ये सध्या स्थल देवता (भुमाता), जल देवता व वन देवता महत्वाचे स्थाने आहेत ती जपण्याचा प्रयत्न करा. कारण कोरोना महामारीमुळे जगाला शिकविले आहे की, निसर्ग हाच मोठा देव आहे, हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिले.
50 व्या जागतिक औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षितता अधिकारी यांचा सन्मान व 150 कारखान्यांना सुरक्षिततेविषयी माहिती पुस्तिका व भित्तीपत्रके याचे वाटप पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
श्नायडर इलेक्ट्रीकल्स (ई.एस.ई.) सभागृहात कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन संपन्न झालेल्या समारंभास आरोग्य व सुरक्षा विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख, श्नायडर इलेक्ट्रीकल (ए.एस.डब्ल्यू.)चे जनरल मॅनेजर अरविंद पारगांवकर, ई.एस.ई विभागाचे प्लँट हेड दिलीप आढाव व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला धनंजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी संकटकाळात वापरावयाच्या विविध उपकरणांची व साधनांची माहिती दिली. चैतन्य खानवेलकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. केंद्रीय पर्यावरण समितीवर अशासकीय सदस्यपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल श्नायडर कंपनीच्या वतीने अरविंद पारगांवकर व दिलीप आढाव यांनी विशेष सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.
स्वप्नील देशमुख यांनी प्रास्तविक करुन गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक सुरक्षिततेसाठी घेत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कोरोनामाच्या महामारीच्या काळात ‘मार्ग’ या संघटनेने सामाजिक जाणिवेतून अनेक सामाजिक संघटनांना अन्नधान्याचे वाटप केले. तसेच’ या माध्यमातून औद्योगिक परिसरातील कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी एक कामगार रुग्णालय उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी उद्योजकांची साथही मोठी महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या वर्षी सुमारे 150 कारखान्यांना सुरक्षितता विषयक मार्गदर्शक पुस्तिका व पोस्टर्स अशा किटचे वाटप केले आहे. तसेच विविध कंपन्यांचे सुरक्षितता अधिकारी ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे, अशांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
दिलीप आढाव यांनी सुरक्षिततेविषयी आपले विचार व्यक्त करतांना नवनवीन मशिन्स् हाताळतांना कामगारांनी व अधिकार्यांनी त्याची पूर्व तपासणी करणे गरजेचे आहे. मशिनमधून आवाज येतो का? आजूबाजूला काही दुर्घटनाग्रस्त गोष्टी दिसतात का? याची सुक्ष्मतेने पाहणी केल्यास भविष्यात होणारे मोठे अपघात निश्चित टळतील, असे आवाहन केले.
अरविंद पारगांवकर यांनी ‘मार्ग’ या संघटनेच्या सामाजिक व सुरक्षिततेविषयी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. स्वप्नील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कार्यामुळे औद्योगिक सुरक्षितता वाढीस लागलेली आहे. उच्च पदस्थ अधिकारी असतांना केवळ नुसत्या सुचनांचा अवलंबन न करता प्रत्यक्षात स्वत:चा वेळ, तन-मनाने देशमुख यांचे कार्य निश्चित वाखणण्याजोगे आहे. याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. सुरक्षितता ही बाब सर्व जगामध्ये संस्कारासारखी बघितली जाते, आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, निश्चितच यामुळे आपल्या सर्वांमध्ये आनंदाची निर्मिती होईल.
या कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते के.एस.पी.जी. ऑटोमोटिव्हज इंडिया , लॅकटेल इंडिया, मिंडा इंडस्ट्रिज, कॅरिअर मिडिया, ए .ए .एम इंडिया मॅनिफॅक्चरिंग , आय .एस .एम .टी, कमिन्स, श्नायडर इलेक्ट्रीक (ई.एस.ई.) श्नायडर इलेक्ट्रीक (ए.एस.डब्ल्यू.), सन फार्मा, एक्साईड इंडस्ट्रिज, गोदावरी शुगर, इटॉन पॉवर, के .एस .बी. लि., शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना, सी.जी.पॉवर, होगनस इंडिया, या कंपनीच्या सुरक्षितता अधिकार्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ज्ञानेश्वर ढमाले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘मार्ग’चे सदस्य सर्वश्री महेंद्र त्रिगुणे, चैतन्य खानवेलकर, सुभाष तोडकर, सचिन ठोसर, ज्ञानेश्वर ढमाले यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कमिन्स या कंपनीच्या एशिया पॅसिफिक ग्लोबल ट्रेनर सुषमा मनी यांनी उपस्थितांना वर्तणुकीनुसार सुरक्षितता या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले व देश-परदेशात सुरक्षिततेविषयी होणार्या कार्याची माहिती दिली.
No comments:
Post a Comment