कल्याणरोडचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन शिंदे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कल्याणरोड परिसराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत असून नागरी लोकवस्ती वाढत आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षापासून या भागाचा पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. या भागातील नागरिकांना पाणी समस्याला तोंड द्यावे लागत आहे. महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विविध आंदोलने, रस्ता रोको, पालिकेत नागरिकांसह पालिका प्रशासनाबरोबर पाणी प्रश्नाबाबत हजोरोवेळा चर्चा झाली. तरीसुद्धा पाणी प्रश्न सुटलेला नाही. कल्याणरोड परीसरातील गणेश नगर येथे दहावर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधून तयार आहे परंतु या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे या भागामध्ये तीव्रस्वरूपाची पाणी टंचाई आहे. तरी महापालिकेने गणेश नगर भागातील टाकीमध्ये पाणी पुरवठा करून सर्वभागाला पूर्णक्षमतेने पाणी द्यावे जोपर्यंत सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अनेकवेळा महापालिकेने पत्रव्यवहार करून दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही त्यामुळे पालिकेवरचा आमचा विश्वास उडाला आहे. पालिका संपूर्ण शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करते व कल्याण रोड भागालाच दहा बारा दिवसांनीच पाणी पुरवठा का केला जातो. याभागातील नागरिक 100 टक्के महापालिकेचा कर भरला जातो तरीसुद्धा कल्याण रोड भागावर पाणी प्रश्नाबाबत अन्याय का केला जातो? दि. 10, वार बुधवार रोजी महापालिकेमध्ये अमरण उपोषणाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक संचिन शिंदे यांनी दिली.
No comments:
Post a Comment