चौक व रस्ते सुशोभिकरणाच्या कामास प्रारंभ
मुलांसाठी खेळाचे मैदान लवकरच निर्माण करू: आ. संग्राम जगतापनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील काही भागांची विकासकामे पूर्ण झाल्यानंतर आता रस्ता व चौक सुशोभिकरणाची कामे हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यकरणात भर पडणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, पेव्हिंग ब्लॉक याचबरोबर समाज जागृतीचे विषय घेतले जाणार आहे. नगरसेवक गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून नानाजी नगरच्या मुख्य रस्ता प्रवेशद्रारच्या सुशोभिकरणाचे काम सुरु केले आहे. नगरसेवक भोसले यांच्या कामाचा आदर्श इतर नगरसेवकांनी घ्यावा. या भागातील ओम कॉलनीमधील मनपाच्या दोन एकर खुल्या जागेमध्ये सर्व प्रकारची खेळाची मैदाने तयार करण्यात येणार असून, या कामासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधीची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. सारसनगरच्या विकासाला चालना देण्यासाठी भिंगार नाल्यावरील 3 पुल तयार केले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
नानाजीनगरमधील मुख्यप्रवेशद्वाराजवळी रस्ता व सुशोभिकरणाचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, कांतीलाल गुगळे, विजय कदम, शुभांगी कदम, दिगंबर जोशी, डॉ. भागवत परकाळ, डॉ. दिलीपकुमार भालसिंग आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. जगताप पुढे म्हणाले की, शहरामध्ये विविध भागात स्पोर्टस् कॉम्प्लेक्स सुरू करण्याची खरी गरज आहे. आजचा विद्यार्थी शिक्षणाबरोबर खेळाकडेही आकर्षित होऊन त्याला व्यायामाचे धडे मिळतील. भवानीनगर परिसरामध्ये जमिनी अंतर्गत विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच भागातील विद्युत तारांचे जाळे कमी करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.
नगरसेवक गणेश भोसले म्हणाले की, विकासकामे करण्यासाठी निधीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. निधीप्राप्त करुन देण्यासाठी आ. संग्राम जगताप हे महत्त्वाचे दुवा आहेत. विकासकामांमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण होत आहे. ज्या भागात विकास होत असतो त्याच परिसरात लोकवस्तीत कायम भर पडत असते. नानाजी नगरच्या पुलापासून सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. लवकरच नगर शहरातील यापरिसरातील रस्ते व सुशोभिककरणाचे उत्तम मॉडेल म्हणून नावरुपास येईल हे नक्की.
No comments:
Post a Comment