मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘आशीर्वाद’ आयोजित ‘माझे जगणे होते गाणे’ कार्यक्रमास प्रतिसाद
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संगीत क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या आशीर्वाद संगीतायन संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करीत मराठी राजभाषा दिनानिमित्त वैविध्यपूर्ण पद्धतीने ‘माझे जगणे होते गाणे’ हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी करोना काळात मृत पावलेल्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींना आणि सतीश भोपे, दीपक बडवे, प्रशांत कांबळे, आर्किटेक्ट अशोक काळे आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कविवर्य कुसुमाग्रज लिखित कवितांचे वाचन, गीतांचे गायन व नाट्यप्रवेशाचे सादरीकरण अशी त्रिमिती लाभलेला हा छोटेखानी घरेलू कार्यक्रम खूपच रंगला. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला दिलेले शब्दवैभव अशा तीन कलांच्या माध्यमातून यावेळी अविष्कृत झाले.
‘आशीर्वाद’चे संस्थापक, अध्यक्ष श्रीराम तांबोळी यांनी संस्थेतर्फे अलीकडच्या काळात झालेल्या व नजीकच्या भविष्यकाळात हाती घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संगीत कार्यक्रमाबरोबरच संस्थेतर्फे जुन्या दर्जेदार नाटकांचेही सादरीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कुसुमाग्रजांच्या ‘सरस्वतीची नौका’ या समूह गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कै. डॉ. गोपाळराव मिरीकर यांनी कुसुमाग्रजांच्या संगीतबद्ध केलेल्या कवितांचे गायन व प्रचलित गीते कलावंतांनी सादर केली. प्रसिद्ध लेखिका शांभवी जोशी, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, सतीश डेरेकर, विवेक दसरे, प्रा. मंगेश जोशी यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या, तर ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी यांनी नटसम्राट या नाटकातील स्वगत मुद्रा अभियनाद्वारे सादर केले. अमृता देशपांडे, अस्मिता शूळ, सूर्यकांत सोळसे, विवेक दसरे, डॉ. दीपा मोहोळे, निलिमा मनवेलीकर, अमिता दसरे यांनी मिरीकरांनी संगीतबद्ध केलेली व प्रचलित गाणी सादर केली. सौ. अमृता बेडेकर यांचे हे सुरांनो चंद्र व्हा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कलाकारांना तबल्यावर सार्थक डावरे व हार्मोनिअमवर नीता प्रथम शेट्टी यांनी समर्पक साथ करून उपस्थितांची दाद मिळविली.
याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ गायक, साहित्यिक, रंगकर्मी, तसेच संस्कार भारतीच्या साहित्य शाखेचे शिरीष जोशी, राहुल तांबोळी, संगीत विभागप्रमुख प्रसाद सुवर्णपाठकी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीराम तांबोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप टोणपे, शिरीष रसाळ, संजय मनवेलीकर, रघुनाथ सातपुते यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment