अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना दिलासा मिळणे आवश्यक: राजश्री घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना दिलासा मिळणे आवश्यक: राजश्री घुले

 अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना दिलासा मिळणे आवश्यक: राजश्री घुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अनेक अडचणींचा सामना करीत शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी पशुपालन हा जोडधंदा उपयुक्त आहे. परंतु, अनेकदा साथरोग तसेच अन्य कारणांमुळे त्याच्याकडील महागडी जनावरे दगावतात. या मोठ्या नुकसानीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हवालदिल होतो. या अडचणीच्या काळात त्याला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्यात येते. यंदाच्या वर्षी जनावरे दगावल्याने नुकसान झालेल्या 69 लाभार्थींना 4 लाख 94 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील वर्षी यासाठीची तरतूद वाढवून शेतकर्‍यांना वाढीव मदत देण्याचा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.
   जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यावतीने साथीचे रोग, विषबाधा, वीजेचा धक्का बसणे अशा विविध कारणांमुळे जनावरे दगावलेल्या शेतकर्यांना सेस फंडातून भरपाई देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 69 लाभार्थींना मदतीच्या धनादेशाचे वितरण जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्षा घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती सुनिल गडाख, उमेश परहर, मीराताई शेटे, काशिनाथ दाते, सदस्या प्रभावती ढाकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंबारे, पशुधन विकास अधिकारी डॉ.वृषाली भिसे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.
   सभापती गडाख यांनी सांगितले की, शेतकर्यासाठी पशुधन हे अतिशय मोलाचे असते. गायी,म्हशी, शेळ्या मेंढ्या पालनातून त्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळते. अनेकवेळा साथीच्या आजारामुळे किंवा अन्य कारणांमुळे हे पशुधन दगावल्यास त्याच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. यासाठीच नगर जिल्हा परिषदेने सेस फंडातून अडचणीत आलेल्या शेतकर्‍याला मदतीचा हात दिला जातो. अशी योजना राबविणारी नगर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ.तुंबारे यांनी सांगितले की, पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकर्यांकडील पशुधनासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. असे असले तरी अनेकवेळा साथीचे आजार पसरल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने जनावरे दगावतात. यासाठी सेस फंडातून शेतकर्‍यांना मदत केली जाते. यात मोठ्या जनावरासाठी 5 हजार, लहान जनावरे वासरे, पारडी, शेळ्या मेंढ्यांसाठी एक हजार रुपये अशी नुकसानभरपाई दिली जाते. शेवटी डॉ.वृषाली भिसे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment