शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायदे मागे घेण्यासाठी लढणे हेच भगतसिंह यांना खरे अभिवादन ः देसाई
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आज देश मोठ्या संकटात सापडलेला असुन शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणुस तसेच बँक कर्मचारी यात भरडले जात आहेत. खाजगीकरणाचे संकट दारावर उभे आहे. शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष हा निव्वळ भारत स्वातंत्र्य व्हावा एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता तर देशातील सर्व प्रकारचे शोषण नष्ट व्हावे व शोषणमुक्त समाजाची निर्मीती व्हावी यासाठी होता. सध्याचे केंद्र सरकार तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर जाणिवपूर्वक आंधळे आणि बहीर्याचे सोंग घेणारे आहे, त्यामुळे कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला आपला आवाज आणखी बुलंद करावा लागणार आहे. आजच्या शहीद दिनी अभिवादन करताना ज्या शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी कायद्यांमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड शोषण होणार आहे ते कायदे मागे घेण्यासाठी लढा करणे हेच शहीद भगतसिंह यांना खरे क्रांतिकारी अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन बँक कर्मचारी नेते उल्हास देसाई यांनी केले.
23 मार्च शहीद दिनी शहरातील भगतसिंह स्मारक येथील पुतळ्यास कॉ.उल्हास देसाई आणि कॉ.दिपकराव शिरसाठ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रा.डॉ.कॉ.महेबुब सय्यद म्हणाले कि भारत हा तरूणांचा देश असुन भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू हे आदर्श आहेत. पण आजच्या काळात शेतकरीपुत्रांनी हा वारसा विसरता कामा नये. शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायद्यांचा धोका ध्यानात घेऊन आंदोलनात आणखी सक्रीय होणे गरजेचे आहे. यावेळी पीस फौंडेशनचे आर्किटेक्ट अर्षद शेख, बँक कर्मचारी संघटनेचे भरत गुजराथी, एआयवायएफचे रामदास वागस्कर, प्रा.डॉ. बाळासाहेब पवार, अ.भा.किसान सभेचे बन्सी सातपुते, भ्रष्टाचार निर्मुलनचे अशोक सब्बन, सिटू संघटनेचे महादेव पालवे, लहूजी लोणकर, रहेमत सुलतान फौंडेशनचे युनुसभाई तांबटकर, उर्जिता फौंडेशनच्या संध्याताई मेढे, एआयवायएफचे शहरजिल्हाध्यक्ष फिरोज चाँद शेख, अमोल चेमटे, सुनिल ठाकरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment