’वेल डन बॉयज’ चित्रपटात नगरचा आशिष झळकणार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्री साईनाथ कम्युनिकेशन व भद्रा प्रॉडक्शन यांची संयुक्ती निर्मिती असलेल्या ’वेल डन बॉयज’ या चित्रपटात नगरच्या आशिष निनगुरकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले असून दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
मुळचा नगरचा जन्मगाव-पाथर्डी, नंतर वांबोरी,ता.राहुरी येथील रहिवासी असणारा आशिष सध्या मुंबईत वास्तव्य करत असून पोस्ट खात्यात नोकरी करत त्याने आपल्या कलेचा वसा जपला आहे. तो सिनेसृष्टीशी संबंधित अनेक क्षेत्रात कामे करत आहे.आशिषने आतापर्यंत काही चित्रपटात व अनेक मालिकांमध्ये त्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखविली असून त्याबरोबरच पटकथालेखन,चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात तो आपली मुशाफिरी करत आहे.यापूर्वी त्याने अनेक वृत्तपत्रे,विविधमासिके व दिवाळी अंकांमधून त्याच्या लेखनाचे पैलू दाखविले असून अभिनेते सुनील बर्वे यांच्या ’हर्बेरिअम’ या पुस्तकाचे शब्दांकनही त्याने केले होते.या पुस्तकाद्वारे त्याला अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली होती.त्यानंतर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांचा प्रवास ’स्ट्रगलर’ या पुस्तकातून मांडला.त्यानंतर त्याचा ’हरवलेल्या नात्यांचं गाव’ व ’न भेटलेली तू’ हे दोन कवितासंग्रह व ’ते 14 दिवस’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहेत. ’रायरंद’चे संपूर्ण लेखन आशिषचे असून त्यानंतर वांबोरी ता.राहुरी येथे चित्रीकरण झालेला ’एक होतं पाणी’ या सिनेमाचे लेखन आशिषचे होते.अनेक जाणकार समीक्षक व चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाची नोंद घेण्यात आली व त्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.
No comments:
Post a Comment