सरकार अस्थिर करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न - खडसे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्याने हताश झाले असून ते महाविकास आघाडी सरकार वर खोटे आरोप करीत असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. काल ते अहमदनगर मध्ये आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला व अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले.
खडसे पुढे म्हणाले की, एखाद्याचा ठरवून कार्यक्रम करायचा असेल तर त्याला बदनाम केले जाते. मलाही बदनाम केले, तसेच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदनाम केले जात आहे. गत वर्षभर लॉकडाऊन असल्याने सर्वच ठिकाणी आस्थापना बंद होत्या.
त्यामुळे शंभर कोटी रुपये कोणाकडे मागितले, हा मोठा प्रश्न आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार नसलाच पाहिजे. मात्र, परमवीरसिंग यांच्या आरोपात तथ्य नाही. बदली झाल्यामुळे आकसापोटी, अन्याय झाला म्हणून आरोप केले जात आहेत. पोलिसांच्या बदल्या हे आस्थापना मंडळ करते. बदल्या मंत्री करूच शकत नाहीत. बदल्यांचे काही नियम आहेत. त्यामुळे पैसे घेऊन बदल्या होतात, याही आरोपात तथ्य नाही असेही ते म्हणाले.
खोटे बोलणे, बदनाम करणे, संभ्रम निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे हे आम्हीही विरोधी पक्षनेते असताना काम केले आहे. मात्र, आजच्यासारखे त्यावेळी राजकारण नव्हते. सध्याच्या विरोधी पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. माझ्यावर आरोप झाले एका आरोपातून बाहेर पडले की दुसरे झाले. मात्र, त्यात काहीच निष्पन्न झाले नाही, असे ही खडसे म्हणाले.
No comments:
Post a Comment