मराठीचे संवर्धन प्रत्येकाच्याच हाती ः डॉ. अमोल बागूल
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने मराठी राजभाषा गौरव उपक्रमांचा शुभारंभ संपन्न
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मराठी लिहिणे ,वाचणे, बोलणे ,ऐकणे, सांगणे यातून मराठी सुदृढ व समृद्ध होत राहणार आहे. मराठी भाषासंवर्धनाची पालखी सक्षम खांद्यांवरून निरंतर प्रवास करत राहणे नितांत गरजेचे झाले आहे. परकीय भाषांच्या आक्रमणाने मराठीचे महत्त्व निश्चितच कमी होणार नाही याची जाण प्रत्येक मराठी माणसाने ठेवणे ही काळाची गरज आहे.महाराष्ट्रातच काय परंतु जगाच्या कानाकोपर्यात नांदणार्या प्रत्येक मराठी माणसाच्या हातीच मराठी संवर्धनाची जबाबदारी आहे, प्रतिपादन दोन राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक तथा सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ.अमोल बागूल यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राज भाषा गौरव दिन उपक्रम शुभारंभ सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ बागुल बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाल्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. वाचनीय पुस्तके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरी होत असते. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहमदनगर यांच्यावतीने 27 फेब्रुवारी 2021 ते 10 मार्च 2021 पर्यंत मराठी राजभाषा गौरव दिन-उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सप्ताहाचे उद्घाटन , ग्रंथ प्रदर्शन, वाचन चळवळीमध्ये योगदान देणार्या मान्यवरांच्या मुलाखती, कवी संमेलन व विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. स्वागत तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले, तर आभार व सूत्रसंचालन रामदास शिंदे यांनी केले. कोरोना प्रतिकूलता कालावधीतील प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर व मास्क चा वापर आदी नियमांचा वापरकार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला
No comments:
Post a Comment