मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचे 22 मार्च पासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर अन्नत्याग, मुक सत्याग्रह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचे 22 मार्च पासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर अन्नत्याग, मुक सत्याग्रह

 मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचे 22 मार्च पासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर अन्नत्याग, मुक सत्याग्रह

पगारवाढीवर तोडगा निघत नसल्याने

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारवाढी प्रश्नी तोडगा निघत नसल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने सोमवार दि.22 मार्च पासून वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग मुक सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे. सदर प्रश्नी येत्या आठ दिवसात तोडगा काढून कामगारांना योग्य पगारवाढ देण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले असल्याची माहिती लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष लांडे व युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी दिली.
 अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे व इतर कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. यापैकी मोजक्या तारखांना विश्वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा एक हजार चारशे पहिल्या वर्षीसाठी, दुसर्या वर्षी दोन हजार आठशे व तीसर्या वर्षी चार हजार दोनशे अशा टप्प्याटप्यांनी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसल्याने कामगारांनी ट्रस्टचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
मेहेरबाबा ट्रस्टचे 120 कोटी रुपयाने बॅलेन्स शीट असताना, कोरोना काळात ट्रस्टने कोट्यावधी रुपयाच्या जमीनीचे खरेदी व्यवहार केले. मात्र कामगारांच्या पगारवाढीसाठी त्यांनी कोरोनामुळे आर्थिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे ओढवलेले आर्थिक संकटामुळे कामगारांचे अत्यल्प पगार असल्याने दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. विश्वस्त सदरील टप्प्याटप्याने पगारवाढ देण्यावर ठाम असल्याने युनियनने महागाईचा विचार करुन यामध्ये वाढ करुन तडजोडीने हा प्रश्न लवकर सोडविण्याचा आग्रह धरला आहे. मात्र विश्वस्त आडमुठी भूमिका घेऊन कामगारांना मागणीप्रमाणे पगारवाढ देत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला असून, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निवेदनावर संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, प्रविण भिंगारदिवे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

No comments:

Post a Comment