विवाहासाठी लटकलेल्या वरांनो एजंट दलालांपासून सावधान...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः मुलांची वये वाढू लागलीत.. मुलींची संख्या कमी झालीय.. मुलांना विवाहासाठी मुली मिळेनात. याच समस्येचा फायदा दलाल, एजंट घेऊ लागले आहेत. मुलगी दाखवून लाखो रुपयांची मागणी करायची. लाखो रुपये उकळले की मुलीने विवाह झाल्यावर पळून जायचे. मुलींचे आई-वडील, मुलींचे घर सर्व काही नकलीच. याला ‘कटींग’ म्हणतात. अशा ‘कटींग’ ला असंख्य मुलं व त्यांचा परिवार बळी पडतोय. काहीजण पोलिसांकडे जातात तर काही जण चूप बसतात. पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर ही टोळी गजाआड होते खरी. पण जामिनावर सुटून पुन्हा हेच उद्योग. मुलांच्या कुटुंबीयाने दिलेले लाखो रुपये परत मिळण्याची गॅरेंटी नाही असाच प्रकार कर्जत तालुक्यात घडलाय. बनावट लग्न लावून लाखो रुपये उकळणार्या टोळीचा प्रमुख, नवरी गजाआड झाली आहे. दोन आरोपी फरार आहेत. याप्रकरणी कर्जत पोलिसांत राजू वैजनाथ हिवाळे (रा. सिंहरोड, पुणे), विलास जोजरे (रा. हिंगोली), मंगलबाई दत्तात्रय वाघ (रा. पोखर्णे, सोनपेठ, परभणी), पल्लवी गोमाजी सगट (रा. मोहाला, सोनपेठ, परभणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.कर्जत तालुक्यातील एका गावातील मुलाचे लग्न जमविण्यासाठी मुलाच्या वडिलांनी स्थळांबद्दल चौकशी केली होती. त्यानुसार राजू वैजनाथ हिवाळे, विलास जोजरे, मंगलबाई दत्तात्रय वाघ, पल्लवी गोमाजी सगट यांनी लग्न जुळविले होते. त्यासाठी त्यांनी दोन लाख दहा हजारांची रक्कम मागविली होती. ती रक्कमही देण्यात आली. त्या महिलेचे अगोदरच तीन लग्न झाले होते. ही माहितीही लपवून ठेवण्यात आली होती.
No comments:
Post a Comment