शिक्षक बदल्यांचा 8 दिवसांत निर्णय
हसन मुश्रीफ यांचे शिक्षक समितीला आश्वासन
मुंबई ः कोरोनामुळे बहुतांश शाळा बंद असल्याने गेल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. यंदा बदली प्रक्रिया राबवण्यात येणार असून, त्याविषयी येत्या 8 दिवसांत शासन निर्णय जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य प्राथमिक शिक्षक समितीला दिले.
शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (दि.16) मंत्रालयात त्यांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते काळूजी बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. येत्या 8 दिवसांत बदली धोरणाबाबत नवीन शासन निर्णय जाहीर होणार असून, बदल्यांमधील खो-खो पध्दत बंद केली जाणार आहे. बदली कालावधी मोजतांना 31 मे ऐवजी 30 जून ही तारीख गृहीत धरण्याबाबत संघटनांनी आग्रही भूमिका मांडली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मंत्री मुश्रीफ यांनी दिले. तसेच शिक्षकांची विनंती बदली करतांना आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची पुर्वीच्या जिल्ह्यातील नियुक्ती दिनांक गृहित धरण्याबाबत मागणी केली. या प्रमुख मुद्यांसह विविध विषयांवर दोन तास सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे संदिप मगदूल,दिगंबर खाकरे,कागलचे तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, चांदवड तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. ऑनलाईन बदल्यामुळे शिक्षकांना बसणारा खो-खो पध्दत होणार असून, रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांना 30 शाळा निवडण्याची संधी मिळेल. तसेच बदलीची तारीख 31 मे ऐवजी 30 जून होणार आहे.
No comments:
Post a Comment