प्रसाद शुगर्स कारखान्याने साडेचार लाख तर तनपुरे साखर कारखान्याने एक लाख उसाचे गाळप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर्स कारखान्याने साडे चार लाख तर डॉ.बा.बा. तनपुरे साखर कारखान्याने एक लाख उसाचे गाळप केले , राहुरीतील व बाहेरच्या सात ते आठ साखर कारखान्यांनी असे एकूण राहुरी तालुक्यातील नऊ लाख मे. टन ऊस हा साखर कारखान्यांनी आपापल्या कारखान्यात गाळप केला आहे.
नगर जिल्ह्यात यंदा ऊस भरपूर उपलब्ध आहे . राहुरी तालुका हे उसाचे आगार समजले जाते . यापूर्वी राहुरी तालुक्यात बाहेरील साखर कारखाने ऊसतोडणीसाठी स्पर्धा करीत होती . मात्र त्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने चार ते पाच साखर कारखान्यांनी राहुरी तालुकाकडे उसासाठी पाठ फिरवली आहे . यावर्षी उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होणे अपेक्षित होते , त्यामुळे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर्स सह अन्य अनेक कारखान्यांनी आपली ऊस गाळप क्षमता वाढवली .ऑक्टोबर अखेरीस हंगामाला सुरुवात झाली . आजअखेर 3 महिन्यात राहुरी तालुक्यातील सुमारे नऊ लाख मेट्रिक टन ऊस तालुक्यातील कारखान्यांसह विविध साखर कारखान्यांनी तोडून आपापल्या कारखान्यात गाळप केला आहे.
वांबोरी येथील प्रसाद शुगर्स कारखान्याची गाळप क्षमता 3 हजार वरून जवळपास साडेचार हजार मे.टन इतकी वाढवण्यात आली . प्रसाद शुगर्सने सव्वा चार लाख मे टन ऊस गाळप पूर्ण केले आहे . ऊसतोडणी कार्यक्रम व अन्य तांत्रिक बाबींकडे कारखाना व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे . दैनंदिन रिकवरी आणि ऊसतोडणी कार्यक्रमाची माहिती घेतली जात आहे . माजी खा. प्रसाद तनपुरे , का .संचालक सुशिलकुमार देशमुख , संचालक सुरेश बाफना यांनी लक्ष घातले आहे .
याशिवाय राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याने अनेक अडथळ्यांवर मात करीत पुन्हा सुरू करण्यास यश मिळवले , आजअखेर डॉ तनपुरे कारखान्याचे एक लाख मे टन ऊस गाळप यशस्वी झाले आहे . सुरुवातीच्या काळामध्ये अनेक दुरुस्त्या कराव्या लागल्या सर्वांच्या प्रयत्नाने कारखाना सुरळीत सुरू असून दैनंदिन 3600 ते 3700 टन दैनंदिन गाळप होत आहे . खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे , उपाध्यक्ष श्यामराव निमसे व संचालक मंडळ यांनी ऊस गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी लक्ष घातल्याचे चित्र आहे .
राहुरी तालुक्यातील ऊसतोडणीसाठी प्रवरा , संगमनेर , अगस्ती , मुळा ,युटेक , दौंड सुगर , अशोक , या साखर कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत असून तालुक्यातील उसउत्पादक शेतकर्यांनी जवळपास साडे तीन ते चार लाख मेट्रिक टन ऊस बाहेरच्या साखर कारखान्यांना दिला आहे . याला साखर उद्योग वर्तुळातुनही दुजोरा व्यक्त केला आहे .सध्या राहुरी तालुक्यात सध्या साडे तीन ते चार लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असल्याचा अंदाज असून आणखी दिड महिना हंगाम चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment