अधिकाधिक शासकीय योजना राबविणार- सरपंच मुक्ताबाई आंधळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

अधिकाधिक शासकीय योजना राबविणार- सरपंच मुक्ताबाई आंधळे

 अधिकाधिक शासकीय योजना राबविणार- सरपंच मुक्ताबाई आंधळे

जोगेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विकासकामांच्या माध्यमातून गावचे रूप पालटण्याचा प्रयत्न करू. विकासकामे करताना कामाच्या दर्जाला विशेष महत्त्व दिले जाईल. विरोधक व सत्ताधारी असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला जाईल. अ.नगर मनपा नगरसेवक रामदास आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी काळात काम करणार आहोत. अधिकाधिक शासकीय योजना गावात राबवून ग्रामस्थांना लाभ मिळवून देऊ, असे प्रतिपादन नूतन सरपंच मुक्ताबाई आंधळे यांनी केले.
अ.नगर महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक रामदास आंधळे यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंधळे बोलत होत्या. सरपंच आंधळे पुढे म्हणाल्या की, गावात अनेक कामे प्रलंबित असून, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व सदस्यांना, तसेच ग्रामस्थांना बरोबर घेऊन नवनवीन योजना राबविल्या जातील. जोगेवाडी गाव राज्यात आदर्श गाव म्हणून नावारूपास आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. गावाला तंटामुक्तीकडे घेऊन जाऊ, असे सांगितले. जोगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या श्रीमती मुक्ताबाई आंधळे व उपसरपंचपदी राजेंद्र आंबिलढगे यांची, तसेच सदस्यपदी बाळासाहेब आंधळे, श्रीमती सविता बडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडीसाठी श्री. आंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सरपंच श्रीमती मुक्ताबाई आंधळे व सदस्य बाळासाहेब आंधळे हे अ.नगर मनपाचे भाजपाचे नगरसेवक रामदास आंधळे यांच्या भावजयी व भाऊ आहेत. नगरसेवक आंधळे यांनी सर्व सदस्यांना व नागरिकांना बरोबर घेऊन एकमताने सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध केली. नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले की, राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. त्यानंतर सर्व विसरून गावच्या विकासाला प्रथम प्राधान्य द्यावे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास गावाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास मोठी मदत होते. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकत्रितरित्या विकासकामे करून गावाला आदर्शगाव म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवावा, असे सांगितले.

No comments:

Post a Comment