एटीयु जदिद उर्दू प्राथमिक शाळेचे कार्य कौतुकास्पद- किरण काळे
काँग्रेसच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अल्पसंख्यांक काँग्रेसच्यावतीने शिवजयंतीनिमित्त माणिक चौक येथील एटीयू जदिद उर्दु प्राथमिक शाळेमध्ये शिवाजी महाराजांवरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. जदीद उर्दू शाळेचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काळे यांनी यावेळी केले.
यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील तसेच सर्व धर्मातील मावळ्यांना संघटित करत स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे जीवन चरित्र आजही लाखो, करोडो लोकांना प्रेरणा देणारे आहे. अल्पसंख्यांक काँग्रेसच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर केलेले निबंध लिखाण हे भारावून टाकणारे आहे, असे यावेळी काळे म्हणाले. उर्दू भाषा ही अभिव्यक्त करण्यासाठीची एक सशक्त भाषा आहे. उर्दू माध्यमाची नगर शहरातून चालणारी जदिद शाळा ही खरोखर कौतुकास पात्र आहे. अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख आणि कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र सखोलपणे अभ्यासण्याची संधी मिळाली आहे,असे प्रतिपादन काळे यांनी यावेळी केले. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देत गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना देखील यावेळी शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा आयोजनामागील भूमिका अज्जूभाई शेख यांनी विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरिफ सय्यद यानी केले. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक नासीर खान सर यानी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment