जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करावी- वसंत लोढा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करावी- वसंत लोढा

 जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करावी- वसंत लोढा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असतांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवसाचा अवधी राहिलेला असतांना विभागीय पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन  वसंत लोढा यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नेतृत्व करणार्‍या सर्व पक्षांच्या नेतेमंडळींना व प्रमुख उमेदवारांना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत वसंत लोढा यांनी जाहीर पत्रक काढून करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी संवेदनशीलता दाखवत जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकत्र येत सामोपचाराने ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले आहे. केलेल्या आवाहनाच्या प्रती वसंत लोढा यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना पाठवल्या आहेत.
वसंत लोढा यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सध्या आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मी देखील एक उमेदवार आहे परंतु सर्वांगी आणि खोलवर विचार केला असता मी असे एक आवाहन करू इच्छितो की, ज्यायोगे सर्व देशासाठी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे ते आदर्श उदाहरण ठरावे, असा त्यामागील शुद्ध हेतूने मी आवाहन करत आहे.आपली अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि कामगार वर्गाची कामधेनू आहे. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्याचेच काम झाले आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये आजही ही बँक नंबर 1 ची बँक म्हणून ओळखली जाते.सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जवळजवळ 75% बँका अडचणीत असताना केवळ नगरची ही बँक आजही आत्मविश्वासाने सुस्थितीत उभी आहे, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. या बँकेच्या उभारणीमध्ये स्व.मोतीभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील, आ. शंकरराव काळे, आ.शंकरराव कोल्हे, बाबूराव तनपुरे, मारुतराव घुले, यशवंतराव गडाख अशा अनेक मान्यवरांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत या बँकेमध्ये कधीही पक्षीय राजकारणाचा वारसा चालवला गेला नाही. उलटपक्षी सर्वपक्षीय समविचारी लोकांनी एकत्र येऊन या बँकेची प्रतिष्ठा आजही टिकवून ठेवलेली आहे.
या निवडणुकीत उतरलेल्या सुकाणू सांभाळणार्‍या सर्व प्रमुख नेत्यांना माझी अशी कळकळीची विनंती आहे, की प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिष्ठा किंवा राजकीय वर्चस्व याचे निकष न लावता आणि या करोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडची दुरावस्था पाहता अशी असंवेदनशील निवडणूक होता कामा नये. निवडणूक जर खेळीमेळीच्या सामोपचाराने बिनविरोध झाली तर त्यासारखा सुवर्ण दिवस या बँकेच्या इतिहासात नसेल, हे आवाहन करताना मी स्वतः उमेदवार म्हणून माझे पहिले पाऊल पुढे टाकत सर्वप्रथम माघार मी घेईन. या अहवानाच्या प्रती मंत्री बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख, आ. राधाकृष्ण विखे, ना. शंकररव गडाख, प्रसाद तनपुरे, ना. प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, आ.अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, सीताराम गायकर, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. आशुतोष काळे, बिपिनराव कोल्हे, उदय शेळके, काकासाहेब कोयटे आदींना पाठवण्यात आल्या आहेत. अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली.

No comments:

Post a Comment