मानवसेवा करणार्या सामाजिक संस्थांमुळे समाज सावरला आहे -राजेंद्र कपोते
नगरी दवंडी/प्रिंतनिधीअहमदनगर ः बेवारस मनोरुग्णांसाठी आधार ठरलेल्या व त्यांच्यावर उपचार करुन पुनर्वसनासाठी कटिबध्द असलेल्या तसेच कोरोनाच्या टाळेबंदीतही आपली सेवा अविरत सुरु ठेऊन माणुसकीच्या भावनेने योगदान देणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पास अहमदनगर पोलीस व महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात झालेल्या या सन्मान सोहळ्यात संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ व वनिता गुंजाळ यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसनाचे कार्य सुरु आहे. या मानवसेवा प्रकल्पात कार्य करणारे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवकांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन रस्त्यावरील निराधार, पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंना आधार देऊन त्यांच्यावर उपचार केले. समुपदेशन करुन त्यांचे कुटुंबात पुनर्वसन करण्याचे कार्य केल्याबद्दल संस्थेस कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेले मानवसेवेचे कार्य प्रेरणादायी असून, अशा सामाजिक संस्थांमुळे समाज सावरला असल्याचे पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले. तर मानवसेवेच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अहमदनगरचे अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ आग्रवाल, विभागीय पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment