शाळा सुरु होऊनही ग्रामीण भागात ‘लालपरी’चे चाक धावेना..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

शाळा सुरु होऊनही ग्रामीण भागात ‘लालपरी’चे चाक धावेना..!

 शाळा सुरु होऊनही ग्रामीण भागात ‘लालपरी’चे चाक धावेना..!

बसअभावी विद्यार्थ्यांची परवड, तारकपूरच्या बसेस सुरु करण्याची मागणी
  रुई छत्तीसी येथे शाळा व कॉलेज असल्याने येथे शेजारील गावातून येणार्‍या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. पंचायत समितीच्या जनरल मिटिंग मध्ये बसेस सुरु करण्याविषयी  ठराव  करण्यात आला. तसेच गुणवडी, हातवळण या गावातील  बसेस साठी संबंधित गावचे पत्र एसटी प्रशासनाला देण्यात येणार असून ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्याविषयी पुन्हा एकदा पत्र व्यवहार करून  पाठपुरावा करणार आहे.           -रवींद्र भापकर,
उपसभापती नगर तालुका पंचायत समिती



नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारांतर्गत येणार्‍या ग्रामीण भागातील बस फेर्‍या लॉकडाऊन पासून अद्यापही बंद असून एसटी बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तसेच शहराकडे येणार्‍या चाकरमान्यांची परवड होत आहे.
   इ. 5 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग नियमितपणे सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातून शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. तसेच बहुतांश शाळा कॉलेज हे ग्रामीण भागातही आहेत. या शाळा कॉलेज पर्यंत जाण्यासाठी आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना एसटी हाच सुरक्षित व एकमेव पर्याय असतो. शाळा- कॉलेजस सुरु झाली मात्र  ग्रामीण भागातील बस फेर्‍या सुरु न झाल्यामुळे  विद्यार्थ्यांची बस अभावी मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. तारकपूर आगाराने ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.लॉकडाऊन कालावधीत मार्च अखेरीस पासून बंद झालेली बस सेवा 25 मे ला सुरु झाली. बर्‍याच  मार्गावरील जलद बसेस सुरु झाल्या. मात्र अजूनही ग्रामीण भागातील बर्‍याच बस फेर्‍या बंदच आहेत त्यामुळे येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सुरक्षित प्रवास म्हणून एस टी कडे नेहमीच पाहिले जाते. विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण  भागातून नित्याच्या कामासाठी शहराकडे येणार्‍या चाकरमाण्यांचीही संख्या जास्त असते. बस नसल्याने महिला, वृद्ध, लहानमुले यांची मोठया प्रमाणात हाल होत आहे.
   तालुक्यातील सोलापूर महामार्गावरील साकत - रुई छत्तीसी मार्गे  धावणार्‍या  नगर -गुणवडी, नगर - हातवळण, वडगाव तांदळी,  कर्जत, राशीन, या तारकपूर आगाराच्या बसेस त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी परिसरातील विद्यार्थी तसेच नागरिकांमधून होत आहे. दरम्यान  यासंदर्भात तारकपूर आगार प्रमुखांशी दूरध्वनीवरून  संपर्क केला असता संपर्क  होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment