निमगाव वाघात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
स्वच्छता अभियान राबवून कोरोनाच्या प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःनिमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर पोवाडे व व्याख्यानाचा कार्यक्रम रंगला होता. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून, स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर गावात कोरोनाच्या प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मयुर काळे, तुकाराम खळदकर, प्रियंका डोंगरे, लहानबा जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
शिवशाहिर तृप्ती गायकवाड हिने शिवाजी महाराजांच्या शौर्यावर सादर केलेल्या पोवाड्यांनी उपस्थित भारावले. तर विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. पै.नाना डोंगरे म्हणाले की, स्वत:पेक्षा इतरांच्या कल्याणासाठी जीवन जगलेले छत्रपती शिवाजी महाराज युग पुरुष ठरले. सर्वसमाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले. ज्या वयात महाराजांनी किल्ले, गड जिंकले त्या वयातील आजचे युवक मोबाईलमध्ये गुरफटले आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन युवकांनी जीवनात वाटचाल करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यध्यापक किसन वाबळे यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून, ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ पळसकर यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment