70 व्या पुण्यतिथीनिमित्त गुणे शास्त्रींना अभिवादन..
गुणेशास्त्रींचे विचार, संशोधन उपचारपध्दती सर्वांना मार्गदर्शक ! आ. अरुण जगतापनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः वैद्य पंचानन गुणेशास्त्री यांनी प्रतिकुल परिस्थितीत गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय उभे करुन सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदीक उपचार सुरु केले. त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदानच ठरले आहे. स्व.गुणे शास्त्रींना जाऊन 70 वर्षे झाली तरी त्यांचे विचार, संशोधन, उपचार पद्धती कायम सर्वांना मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत, असे प्रतिपादन आ.अरुण जगताप यांनी केले.
कै.वै.पंचानन गंगाधर गुणे शास्त्री यांच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील त्यांच्या समाधीला संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच गुणे शास्त्रींनी लिहिलेल्या ‘सार्थ वाग्भट, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, भिषग्विलास, सिद्धौषधे, आयुर्वेदिय औषधी गुणधर्मशास्त्र, संयुक्त कल्प आदि आयुर्वेदिक ग्रंथांचे पुजन आ.जगताप यांनी केले. तसेच स्व.गुणे यांच्या महाविद्यालयातील पुतळ्यास आ.संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
दरवर्षी महाविद्यालयाच्यावतीने गुणे शास्त्रींच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात येणारी ग्रंथदिंडी यावर्षीच्या कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. आ.संग्राम जगताप म्हणाले, स्व.गुणे शास्त्री यांनी सुरु केलेले आयुर्वेदिक उपचार आजच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपचार काळातही प्रभावशाली आहेत. त्यामुळे गुणे आयुर्वेद रुग्णालयातून सर्वसर्वसामान्य रुग्णांवर केले जाणारे उपचार त्यांच्यासाठी वरदान ठरत आहेत. आयुर्वेद उपचार प्रभावी असल्याने संपूर्ण जगाने आत्मसात केले आहे. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाने गुणे शास्त्रींच्या स्मृती कायम जतन केल्या आहेत.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ.विजय भंडारी, संचालिका वैशाली ससे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रभारी प्राचार्या डॉ.प्रमिला दिवटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर होळकर, डॉ.ए.टी.देशमुख आदिंसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment