सत्ता आल्यानंतर भाजपला पेन्शनच्या आश्वासनांचा विसर पडलाः गुजराती
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांची शहरात बैठकनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महागाईने जनता त्रस्त असताना वृध्दापकाळाची काठी असलेल्या पेन्शनमध्ये सरकारने वाढ करण्याची गरज आहे. प्रश्न गंभीर बनत असल्याने देशात आंदोलने उभी राहत आहे. मागणी करुन प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. भाजप जो पर्यंत विरोधी पक्ष होता, तो पर्यन्त ते पेन्शन प्रश्नावर आमच्या सोबत होते. मात्र सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे केंद्रीय कार्यकारणी कार्याध्यक्ष सुधाकर गुजराती यांनी केले.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर विभागाची टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना गुजराती बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे कॉ. आनंदराव वायकर, संघटनेचे अध्यक्ष बलभिम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे माजी केंद्रीय कार्याध्यक्ष दिवंगत रमेश गवळी व संघटनेचे खजिनदार खुशालसिंग परदेशी व इतर दिवंगत कर्मचार्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉ. आनंदराव वायकर यांनी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारींचे व इतर क्षेत्रातील कर्मचारींचे प्रश्न सारखेच आहे. विशेषत: त्यांना मिळणार्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये त्यांचा उदरनिर्वाह अशक्य असल्याचे सांगितले. तर सत्ताधारी सेवानिवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन व इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या बैठकित ज्यांची शिल्लक रजेच्या रकमेबाबत व पेन्शन चालू न झालेल्या प्रश्नावर विभागीय कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन सुद्धा प्रश्न मार्गी लागला नसल्याचा खुलासा तसेच संघटनेची सध्य परिस्थिती व विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. 1996 च्या करारानुसार कपात केलेली 5 टक्के रक्कमेचा फरक परत करण्याची व पेन्शनमध्ये वाढ होण्याची मागणी करण्यात आली. तर 9 मार्च रोजी होणार्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे सर्व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारींना आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment