महाराष्ट्राच्या 54व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शानदार शुभारंभ
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन सानिध्यात महाराष्ट्राच्या 54 व्या तीन-दिवसीय प्रादेशिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ हर्षोल्हासपूर्ण वातावरणात आज ‘संपूर्ण अवतार बाणी’ तसेच ‘सम्पूर्ण हरदेव बाणी’च्या पावन पदांच्या गायनाने होत आहे. जगभरातील लाखो भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो निरंकारी भक्तगण समागमात प्रत्यक्ष सहभागी होत असत पण सद्य परिस्थितीत व्हर्च्युअल स्वरुपात घरबसल्या या आध्यत्मिक समागम सोहळ्याचा आनंद घेत आहेत, अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी दिली.
समागमाचे प्रसारण व्हर्च्युअल रूपात दि.26, 27 व 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टी.व्ही. चॅनलवर केले जाणार आहे.या कार्यक्रमामध्ये सद्गुरुंच्या पावन दर्शनाबरोबरच भक्तीसंगीत आणि व्याख्यानांच्या माध्यमातून संत-महात्म्यांचे ओजस्वी व प्रेरणादायी विचार श्रवण करता येतील. या वर्षी कोरोना महामारीमुळे समागमाची व्यवस्था व्हच्र्युअल रूपात अशा प्रकारे करण्यात आली आहे ज्यायोगे भक्तगणांना तशीच अनुभूती यावी जशी खुल्या प्रांगणातील समागम मंडपामध्ये बसून मिळते.
या वर्षी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ठेवण्यात आला आहे. मानवतेने युक्त सहज, सरळ व सुंदर जीवन जगण्यासाठी जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये स्थिरतेची नितांत आवश्यकता आहे. मग ही स्थिरता आहे तरी काय? ती प्राप्त करण्याचा उपाय कोणता आणि मानवी जीवनाशी तिचा संबंध तरी काय आहे? या सर्व तथ्यांच्या बाबतीत समागमाच्या तिन्ही दिवशी वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा केली जाईल. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल.
पूर्वेतिहास पाहिला तर दरवर्षी समागमाचा प्रारंभ महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशाच्या इतर प्रांतांतील लोकसंस्कृतींचे प्रतिनिधित्व करत अनेकतेत एकतेचे दर्शन घडविणार्या रंगीबेरंगी शोभायात्रेद्वारे होत आला आहे. तथापि, या वर्षी समागमामध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोलीभाषांसह देशातील अन्य भाषांच्या माध्यमातून भक्तीगीते, अभंगवाणी, कविता आणि व्याख्यानांच्या माध्यमातून अनेकतेत एकतेचा अद्भुत संगम पहायला मिळेल ज्यातून सर्वांना सद्भाव आणि एकत्वाची प्रेरणा प्राप्त होईल.
No comments:
Post a Comment